महाराष्ट्र संवाद न्यूज विशेष लेख
आयुष्यात आपण वेगवेगळया लोकांकडून अनेक गोष्टी शिकत असतो. काहींकडून आपल्याला थेट शिकायला मिळते तर काहीवेळा आपल्याला एकलव्याची भूमिका पार पाडावी लागते. मात्र माझ्या बाबतीत कॉर्पोरेट क्षेत्रात थेटपणे आणि एकलव्याच्या भूमिकेतून अशा दोन्ही माध्यमातून मी ज्या व्यक्तीकडून खूप काही शिकलो त्यातले सर्वात महत्वाचे नाव म्हणजे श्री. राजेश मालपाणी. 32 वर्षांपूर्वी त्यांनीच नोकरीसाठी माझी मुलाखत घेतली होती. त्यावेळी स्वप्नातही वाटलं नव्हतं की या व्यक्तीबद्दल मला कधीतरी सविस्तर लिहिण्याची संधी मिळेल. परंतू तो योग जुळून आला आणि राजेश भाऊंच्या कॉर्पोरेट आयुष्याचा वेध घेणारे पुस्तक माझ्या हातून साकारले. पुस्तकाला नाव दिले ‘ओपन सिक्रेट’
हे माझे तेरावे पुस्तक. संगमनेरमधील जाणता राजा मैदानावर उद्या या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे.
आजवर प्रत्येक पुस्तक पूर्ण झाल्यावर आणि ते प्रकाशित झाल्यावर एक अनामिक समाधान मिळत होते. मात्र ओपन सिक्रेट या पुस्तकाच्या निमित्ताने मनात केवळ समाधानाची नव्हे तर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाची भावना आहे. मागील 32 वर्षांच्या कार्पोरेट आयुष्यात मला सर्वाधिक प्रभावित करणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहे त्यात पहिल्या क्रमांकावरील व्यक्ती म्हणजे श्री. राजेश मालपाणी. ज्यांच्या केवळ सहवासातून आपण समृद्ध होतो असे व्यक्तिमत्व म्हणजे राजेशभाऊ. कॉर्पोरेट क्षेत्रात असंख्य संकल्पना वापरल्या जातात या संकल्पनांच्या पलीकडे जाऊन विचार करणारे व्यक्तिमत्व म्हणजे राजेशभाऊ. प्रचंड बुद्धिमान म्हणुन गणली जाणारी दहा वीस माणसे मिळून जे काम करू शकणार नाही इतके काम मागच्या काही वर्षात या एकट्या माणसाने करून दाखवले आहे.
आर्थिक संपन्नता असणारे उद्योजक आपल्या अवतीभोवती अनेक असतात परंतू ज्यांच्याकडे सर्वार्थाने समृद्धी आहे असे फार मोजके लोक मी बघितले आहे. यात राजेश भाऊंचा सर्वात वरचा क्रमांक आहे. अशा राजेश भाऊंचे पुस्तक लिहिण्याची संकल्पना काही दिवसांपूर्वी समोर आली. लेखन आणि इतर अनेक गोष्टीत आमचे विचार खूप मिळते जुळते आहेत, अशा डॉ. संजय मालपाणी यांनी मोठ्या विश्वासाने ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. मराठीतला कोणताही बडा लेखक घेऊन त्यांना हे काम सहज करता येऊ शकत होते परंतू त्यांना या कामासाठी मी योग्य वाटलो. माझ्यावर टाकलेली जबाबदारी जितकी आनंद देणारी होती त्यापेक्षा अधिक तणाव हे शिवधनुष्य आपल्याला पेलता येईल का याचा होता.
पुस्तक करायचे या कल्पनेबरोबरच राजेशभाऊ अनेक बाबतीत ठाम होते. राजेश भाऊंची पहिली अट होती, हे एका व्यक्तीचे चरित्र नसावे तर मालपाणी उद्योग समूहाची वाटचाल त्यात असावी, माझ्या एकट्यावर अजिबात फोकस नको. कौटुंबिक आयुष्यावर फारसा फोकस न करता कार्पोरेट गोष्टींवर भर द्यावा. हे करताना माझ्यापुढे सर्वात मोठी भीती ही होती की त्यांच्या केवळ कार्पोरेट आयुष्यावर फोकस करतांना हे पुस्तकं त्यांच्या कामांची जंत्री होऊ नये किंवा हे पुस्तक म्हणजे एखादा अहवाल वाटू नये.
पुस्तकाचे आव्हान घेऊन कामाला सुरूवात केली. एकेक मुलाखती सुरू झाल्या परंतू ज्यांना ज्यांना भेटायचो ते सर्वजण राजेश भाऊंचे गुण वर्णन करायचे जे मलाही माहीत होते. पुस्तकाला रंगतदार करण्यासाठी गरज असते ती विविध घटना, किश्शांची. पण शेवटी मीच अनुभवलेले राजेशभाऊ अगोदर लिहायला घेतले. हळूहळू एकेक गोष्टी उलगडत गेल्या. तीस चाळीस लोकांच्या मुलाखती घेतल्या. पुस्तक साठ टक्के लिहून झाले आणि माझा छोटासा अपघात झाला. प्रचंड टेन्शन आले परंतू अपघाताच्या चौथ्या दिवशी जरा बसण्याचा प्रयत्न केला आणि पुस्तकाचे एक प्रकरण लिहून काढले. त्याच मध्यरात्री अचानक पुस्तकाचा शेवट सुचला. शेवटचे प्रकरण विसरू नये म्हणुन मनातल्या मनात तो प्रसंग आठवित रात्री जागत राहिलो. पाचव्या दिवशी मनाशी ठाम निर्णय केला आणि ऑफिसला गेलो आणि पुस्तकाचा शेवट लिहून काढला. त्यापूर्वी कधी सुचल्या नाहीत तितक्या गोष्टी सुचत गेल्या. नंतर इतर प्रकरणे लिहीत गेलो. अखेरीस पुस्तक पूर्ण झाले.
शुक्रवार दिनांक 17 रोजी जाणता राजा मैदानावर हजारो संगमनेरकरांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. मालपाणी परिवार सदस्यांबरोबरच माझ्यावर नितांत स्नेह करणारे आमदार बाळासाहेब थोरात हे यावेळी उपस्थित असणार आहेत.
पुस्तकात काय काय आहे हे थोडक्यात सांगायचे झाले तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने आयुष्यात आपला दृष्टिकोन कसा ठेवावा, कोणत्याही गोष्टीचा विचार करतांना त्याच्या वेगवेगळया पैलुंकडे कसे बघावे. नाती कशी जपावी आणि वृद्धिंगत करावी, उद्योग व्यवसायात भांडवलाची व्याख्या केवळ पैसे, मशिनरी, इमारत. गाड्या इतकीच मर्यादित न ठेवता ‘ह्युमन ॲसेट’ हा त्यातला खूप महत्वाचा घटक आहे याचे विवेचन. माणसांमधील नैपुण्याचा शोध, वेळेचे व्यवस्थापन आणि सतत नाविन्याचा ध्यास. अशा अनेक गोष्टींकडे राजेशभाऊंनी कसे बघितले हे विविध प्रसंग उदाहरणांद्वारे वाचायला मिळणार आहे.
17 ते 20 फेब्रुवारी दरम्यान संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानावर राजेशजी मालपाणी यांचा अभीष्टचिंतन सोहळा होत आहे. या ठिकाणी हे पुस्तक उपलब्ध आहे. मूळ 300 रुपये किमतीचे हे पुस्तक राजेश मालपाणी यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने केवळ 100 रुपयात उपलब्ध असणार आहे. अर्थात पुस्तक विक्रीतून आलेली सर्व रक्कम एका सेवाभावी संस्थेला देण्यात येणार आहे.

