महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांचा शपथविधी शनिवारी राजभवनातील दरबार हॉलमध्ये होत आहे. या समारंभात रमेश बैस आपली राज्यपाल पदाची सूत्रे स्वीकारतील. दरम्यान नव्या राज्यपालांकडून महाराष्ट्राचा व महापुरुषांचा सन्मान राखला जावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोश्यारी यांच्याप्रमाणे नव्या राज्यपालांनी दिल्ली सरकारच्या तालावर नाचणारे कळसूत्री बाहुली म्हणून काम पाहू नये, अशी राज्यातील जनतेची अपेक्षा आहे. त्यांची झारखंड मधील कारकीर्द भगतसिंग कोश्यारी यांच्याप्रमाणेच वादग्रस्त राहिली आहे. 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये बैस केंद्रीय राज्य मंत्री होते. 1999 ते 2004 या काळात त्यांनी केंद्रात माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री तसेच रसायने व खते राज्यमंत्री, 2003 मध्ये केंद्रीय खाण मंत्रालयात राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र पदभार, त्यानंतर काही काळ केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. 2009 ते 2014 या काळात ते भाजपचे लोकसभेतील मुख्य प्रतोद होते.
2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीनंतर रमेश बैस यांचे त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 29 जुलै 2019 ते 13 जुलै 2021 या काळात त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम बघितले. त्यानंतर 14 जुलै 2021 पासून त्यांच्याकडे झारखंडच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता त्यांचे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली असून 18 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी ते राज्यपाल पदाची सूत्रे स्वीकारतील.
नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी समारंभ 18 फेब्रुवारीला दुपारी 12.40 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये होणार असून तत्पूर्वी 17 फेब्रुवारीला सायंकाळी पावणे सहा वाजता ते मुंबईत येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मान्यवरांसह बैस यांचे मुंबई विमानतळावर त्यांचे स्वागत करतील.

