महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीला घातक ठरणारा आहे. ठाकरे आणि शिवसेना हे एक समीकरण आहे शिवसेना ठाकरेंपासून वेगळी असू शकत नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात माध्यमांशी बोलत होते.
शिवसेना आणि ठाकरे यांना वेगळे काढू शकत नाही. महाराष्ट्रातील जनतेला निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मान्य होणार नाही. आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. pic.twitter.com/0yccP96mAt
— Balasaheb Thorat (@bb_thorat) February 17, 2023
थोरात म्हणाले, जो निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे तो लोकशाहीला घातक अशा प्रकारचा आहे. शिवसेना ठाकरेंपासून वेगळी काढू शकत नाही. ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण आहे. ठाकरेंनी पूर्ण आयुष्य शिवसेना संघटना वाढविण्याकरिता घातलेले आहे. कदाचित आयोगाने असा निर्णय दिला असला तरी जनता जो निर्णय देईल तो उद्धवजींच्या बाजूने असेल.
या निवडणुकांमध्ये आपल्याला हा निर्णय दिसून येईल. आयोग स्वायत्त संस्था आहे. निरपेक्ष भावनेने निर्णय देणे, कोणा एका बाजूच्या नाही. ही या संस्थांची जबाबदारी असते. आजच्या या निर्णयामुळे या स्वायत्त संस्थेमध्ये किती राजकारण झालेलं आहे हे प्रत्यक्ष उदाहरण दिसत आहे.
देशामध्ये ज्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे ते भारतीय जनता खपवून घेणार नाही आणि उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. निवडणूक आयोगाच्या बाबतीत राजकारण स्पष्टपणे दिसत आहे. कधी नव्हे एवढा अन्याय लोकशाहीवर ते करत आहे असे म्हणणे वावग ठरणार नाही. याबाबतीत वेगळं सांगण्याची गरज नाही. सामान्य जनता सुद्धा हे सगळं ओळखून आहे.
जनतेला लोकशाही संपवून चालणार नाही जनता लोकशाहीच्या बाजूने म्हणजेच शिवसेना उद्धव ठाकरेंच्या मागे उभी राहील, याची खात्री आहे. असे ते शेवटी म्हणाले.

