अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी स्पष्टपणे “आहे त्याच जागेवर वाढीव जागेसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे”. त्यामुळे काँग्रेस शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांचा छत्रपतींच्या पुतळ्याबाबतचा दावा सपशेल खोटा ठरला असून भारतीय जनता पक्ष मात्र एक एकरामध्ये छत्रपतींचा पुतळा उभारण्यास बांधील असल्याचा पुनरुच्चार माजी उपनगराध्यक्ष भाजप शहर सरचिटणीस जावेद जहागीरदार यांनी केला आहे.
नवनिर्वाचित आमदार तांबे यांनी संगमनेर मधील एका सायं दैनिकाला मुलाखत देताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या बाबतची भूमिका स्पष्ट केली. त्यात तांबे यांनी म्हटले आहे की, “सध्या नवीन पूर्णाकृती अश्वरुढ पुतळा उभारण्याबाबत सरकारचे नियम कठीण झाले असून त्यास, परवानगी मिळत नाही. परंतु शहरातील त्या जागेवर वाढीव जागेसह लवकरच पुतळ्याचे सुशोभीकरण करू.” या मुलाखतीचा धागा पकडत जहागीरदार यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या शहराध्यक्ष दिवटे यांचा खोटारडेपणा समोर आणत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
जहागीरदार म्हणाले, मध्यंतरीच्या काळात शहरात शिवप्रेमींचा महत्त्वाचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ स्मारक उभारण्याची चर्चा झाली होती. आम्ही त्यावेळेस सांगितले होते की, आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ३० वर्षापासून नगरपालिका ताब्यात असताना या नेत्यांना छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा अश्वरूढ स्मारक उभारता आला नाही. त्यावेळी आम्ही जी भूमिका मांडली त्यावरून काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी आतताईपणा करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासंदर्भात दिशाभूल करणारी वक्तव्य केली होती ती आज त्यांच्याच आमदारांनी खरी ठरविली आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस पक्ष संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा उभारू शकत नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. असे असले तरी आम्ही आमच्या शब्दाशी आजही कायम आहोत.
त्यामुळे आमचे संगमनेरकरांना पुन्हा एकदा आवाहन आहे की, सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता केंद्रात आणि राज्यात असल्याने आमचे मार्गदर्शक भाजपचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगर परिषदेमध्ये परिवर्तन घडवत एकहाती भाजपाला सत्ता दिल्यास आम्ही एक एकर मध्ये छत्रपतींचा भव्य अश्वारूढ पुतळा उभा करून दाखवू, शासनाचे नियम व अटी आम्हाला माहिती आहे फक्त त्या पूर्ण करण्याची इच्छाशक्ती पाहिजे. सत्ताधाऱ्यांना तीस वर्षात जे करता आले नाही ते आम्ही पाच वर्षात साध्य करून दाखवू.

