रविवार विशेष लेख ● प्रवीण पुरो
राजकारणात काही व्यक्तींची निर्मिती ही केवळ वादळ निर्माण करण्यासाठीच असते, असं म्हणतात. त्यात ती व्यक्ती प्रशासनाचा भाग असेल तर वादळांची काही कमी नाही. जेव्हा तेव्हा वादळं येतातच. नुकतेच राजीनामा देऊन घरी गेलेले एकेकाळचे संघ प्रचारक आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची झिंग अजूनही उतरलेली दिसत नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री अशी पदं भूषवून निवृत्त झालेल्या जबाबदार व्यक्तीने त्या काळातील सामान्य गोष्टींची फार वाच्यता करू नये. त्या पदाच्या गरीमेला ते शोभा देत नाही. तसं नसतं तर निवृत्त झालेल्या राष्ट्रपतीने आपल्या जीवनातील अनेक किस्से ऐकवले असते. राज्यपाल आणि मुख्यमंत्रीही मागे राहिले नसते. संकेत आणि संस्कृतीचा तो भाग आहे. राज्याचे निवृत्त राज्यपाल भगतसिह कोश्यारींनी या संकेताला मुठमाती दिली आहे. यामुळेच ते उफराटे गृहस्थ ठरले आहेत.
कोश्यारींच्या राज्यपालपदाच्या काळात राजभवनात घडलेल्या असंख्य घटनांचं एक चांगलं पुस्तक छापलं जाऊ शकतं. इतक्या घटनांना त्यांनी राजभवनात जन्म दिला. स्वत: अडचणीत येताच त्यांनी पळपुटेपणाही केला. आता निवृत्ती घेतल्यावर राज्याच्या सत्तेवर असलेल्या सरकारविषयी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंविषयी काहीबाही वक्तव्य करत त्यांनी आपण किती कुपमंडलू आहोत हे दाखवून दिलं आहे.
महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारकांच्या भूमीत राज्यपाल होण्याचा मान मिळाला हे आपलं भाग्य सांगणार्या या राज्यपालाने याच भूमीत जन्मलेल्या छत्रपती शिवरायांचा केलेला अवमान कोण विसरेल. छत्रपतींविषयी टीका करताना त्यांना जराही लाज वाटली नाही. या भूमीतील समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले, त्यांच्या पत्नी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वायफळ चर्चा करताना या माणसाला महाराष्ट्र ही संताची भूमी वाटली नाही?
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मरणाची कायम प्रतिक्षा करणार्या कोश्यारींनी उध्दव ठाकरेंना उद्देशून लिहिलेल्या पत्रातील भाषा ही राज्यपाल पदाची शोभा घालवणारीच नव्हती तर देशाच्या संविधाला आव्हान देणारी होती, हे त्यांच्या लक्षात नसेल. मुख्यमंत्री ठाकरे यांना कमी लेखणारा दर्प त्यांच्या पत्रातील प्रत्येक शब्दात होता. यामुळेच त्या भल्यामोठ्या पत्रात त्यांनी उध्दव यांना हिंदुत्व केव्हापासून सोडलंत, असा सवाल करत अक्कल पाजळली होती. संविधानाने ठरवून दिलेल्या चाकोरीबाहेरचे प्रश्न करत खरं तर कोश्यारींनी संविधानालाच आव्हान दिलं होतं. हे प्रकरण तेव्हा न्यायालयात गेलं असतं तर कोश्यारींना तेव्हाच राजीनामा देऊन घरचा रस्ता धरायला लागला असता. कोश्यारींच्या नशिबाने तेव्हा विरोधी पक्षात भाजप आणि त्या पक्षाचे नेते होते. ते सत्तेत असते तर राज्यभरातून कोश्यारींवर तक्रारींचा पाऊस पडला असता. महाविकासच्या नेत्यांना वाटलं माणूस साधारण आहे सुधारेल. पण शेप वाकडी ती वाकडीच. त्यांच्यात जराही सुधारणा झाली नाही.
आता निवृत्ती घेतल्यावर त्यांनी पुन्हा तोंड उघडलं आहे. ते उध्दव यांना उद्देशून भला माणूस म्हणतात. मात्र तो शकुनी मामाच्या चक्करमध्ये फसल्याचं सांगतात. हा शकुनी मामा म्हणजे कोण, असा प्रश्न सहज कोणालाही पडेल. महाविकास आघाडीची एकूण घडण लक्षात घेता कोश्यारींनी एकतर शरद पवार यांना वा संजय राऊतांना उद्देशून हा वाक्प्रचार केला असावा. हे दोन्ही नेते राज्यातील गणमान्य व्यक्ती आहेत. त्यांच्याविषयी असा उल्लेख करणं हे राज्यपाल म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या व्यक्तीला शोभा देत नाही, याचंही भान कोश्यारींनी ठेवलेलं दिसत नाही. त्या सरकारविरोधात तक्रारी करण्यासाठी आपल्याकडे तेव्हाचे सत्ताधारीच येत होते, असं सांगणार्या कोश्यारींनी तेव्हा मुख्यमंत्री उध्दव यांना कधी अवगत केल्याचं आठवत नाही. उलट त्यांना अंधारात ठेवून कोश्यारींनी सरकारविरोधाला चालनाच दिली. राज्यप्रमुख म्हणून त्यांची ही कर्तव्यातील सर्वात मोठी चूक होती.
उध्दव ठाकरे इतके अस्थिर होते की त्यांच्या आमदारांनाही ते भेटत नाहीत म्हणून आपल्याकडे तक्रार घेऊन यायचे, असं सांगणारे कोश्यारी सरकारलाच एकार्थी आव्हान ठरले होते. दिलेल्या मुलाखतीत उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाच्या पात्रतेचे नव्हते, असं सांगत तर कोश्यारींनी अक्कल गहाण ठेवल्याचं दिसतं. ज्या उध्दव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाविषयी भाजप वगळता सर्वांनीच कौतुकाचे शब्द काढले. भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने प्रशंसा केली. जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केलं. सगळ्याच राज्यांनी पाठ थोपटली, जगाचा पोशिंदा मानला जाणार्या अमेरिकेने दखल घेतली आणि राज्याचे प्रमुख असलेल्या राज्यपालाला ते कमजोर वाटले? याचा अर्थ राज्यपाल कोश्यारींच्या मनात किती आडंवेडं होतं, हे लक्षात येईल. पुन्हा ते उध्दव यांना बळीचा बकरा बनवलं गेलं असं सांगतात, त्यांना जबरदस्तीने मुख्यमंत्री केलं गेलं, असली फेकाफेक करत कोश्यारींनी कमालच केली. उध्दव यांनी त्यांचं संघटन मजबुत करायला हवं होतं, त्यांनी मुख्यमंत्री व्हायला नको होतं, असं सांगणार्या कोश्यारींच्या पोटातील मळमळ उघड दिसते.
छत्तीसगडला जाण्यासाठीच्या विमानातून खाली उतरवल्याने उध्दव यांना पायउतार व्हावं लागलं, हे कोश्यारींचं म्हणणं केवळ उफराटंच नव्हे तर एखाद्या व्यक्तीला दिलेल्या अधिकाराचा अपलाप होय. प्रभूची लीला वाटणार्या कोश्यारींना तेव्हा त्याच प्रभूने विमान का उपलब्ध करून दिलं नाही, याचं भान कोश्यारींना नाही. याच लीलेला ते उध्दव यांच्या सरकार पायउतारीचं निमित्त सांगतात तेव्हा हसावं की रडावं कळत नाही. सरकार बनवण्यात विलंब होत असल्याचं निमित्त करत राज्यात राष्ट्रपती राजवट लावणार्या कोश्यारींनी फडणवीसांच्या रातोरातच्या शपथेसाठी राष्ट्रपती राजवट उठवायला लावली ही कोश्यारींची कर्तबगारी नव्हती?
विधान परिषदेत नियुक्त करायच्या 12 आमदारांच्या यादीबाबत तर कोश्यारींनी खोटारडेपणाचा कळस केला. यादीतील व्यक्तींना आमदार बनवण्यासंबंधी विशिष्ट कालावधी नसल्याचा गैरफायदा कोश्यारींनी घेतला. महिना उलटूनही त्यांनी निर्णय घेतला नाही. उच्च न्यायालयाने कान उपटण्याचाही प्रयत्न केला तरी बधले नाहीत. अखेर आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून उध्दव ठाकरे यांनी त्यांना खरमरीत पत्र लिहिलं. या पत्रात 15 दिवसात निर्णय द्यावा, अशी मागणी केली. कोश्यारींकडे आमदार नियुक्तीसाठी ठराविक कालावधीची मागणी होणं हीच कोश्यारींची कमजोरी होती, हे त्यांच्या आजही लक्षात आलेलं दिसत नाही. ज्या पाच पानी पत्राचा उल्लेख कोश्यारी करतात ते पत्र तेव्हा सार्वजनिक झालं होतं. त्यात राज्यपाल पदाचा मान जाईल, असं उध्दव यांनी काही म्हटल्याचं आठवत नाही. उलट कोश्यारींच्या लहरी वर्तणुकीमुळे या पदाचा मान कसा जाऊ शकतो हे स्पष्ट करण्यात आलं होतं. या पत्रात राज्यपालांना धमकी देण्यात आली असेल तर ते पत्र कोश्यारींनी जाहीर करावं, असं आव्हान महाविकास आघाडीवेळचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देऊन कोश्यारींना उघडं पाडलं आहे.
सारं जग कोरोनाने सुन्न झालं असताना राज्यातील सार्वजनिक स्थळं बंद करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे घेतला. पण हा निर्णय भाजपेतर सरकार घेत असल्याचं निमित्त करत कोश्यारींनी त्यातही तोंड घातलं. मंदिरं खुली करण्यासंबंधी त्यांनी लिहिलेल्या पत्रांमधली भाषा तर आगलावी होती. भाजपचे नेते तेव्हा सरकारविरोधी आग ओकतच होते. हिंदूंच्या भावनांचं निमित्त करत देवेंद्र फडणवीसांपासून शेलारांपर्यंतची माणसं मंदिरं, बसेस, ट्रेन सुरू करण्यासाठी आकांडतांडव करत होते. त्यांच्या या हट्टाचा धक्का अखेर नाशिकच्या दौर्यात बसला आणि भर हॉस्पिटलमधून त्यांना काढता पाय घ्यावा लागला. राज्यपालपदावरील माणून हा सर्वथैव योग्यच असेल असं नाही. तो मानवी स्वभाव आहे. चुका होणं हा मानवी धर्म आहे. पण आपल्या चुकांसाठी दुसर्याला मुर्ख समजणं हा दांभिकपणा झाला. तो कोश्यारींनी महाराष्ट्रात येऊन केला आणि आता तेच महाराष्ट्राला खोटं ठरवताहेत याचंच वाईट वाटतं.

