महाराष्ट्र संवाद न्यूज
बहुतांशी गुन्ह्यामध्ये पोलिसांकडून ५०४, ५०६ हे कलम लावले जाते. अशाच एका कलम ५०६ अंतर्गत प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. यामुळे कडू यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषदेमध्ये २ नोव्हेंबर २०१५ मध्ये आंदोलन करण्यात आले होते. अपंग निधी अखर्चित राहिल्याने प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आक्रमक आंदोलन केले होते. या आंदोलना दरम्यान आमदार बच्चू कडू आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता.
त्यानंतर या संदर्भात प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह प्रहारचे मयूर काकडे बलराज रणदिवे बाळासाहेब कसबे आणि चंद्रकांत जाधव या पाच जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे तसेच कलम ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेश गुप्ता यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. ॲड. महेंद्र देशमुख यांनी सरकारच्या वतीने न्यायालयासमोर बाजू मांडली. न्यायाधीश गुप्ता यांनी आमदार बच्चू कडू वगळता उर्वरित सर्व आरोपींना निर्दोष ठरविले तर शासकीय कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्यातून सर्वांना निर्दोष सोडण्यात आले आहे मात्र बच्चू कडू यांना कलम ५०६ अंतर्गत दोषी ठरविण्यात आले आहे.

