महाराष्ट्र संवाद न्यूज
नाशिक येथील ज्येष्ठ साहित्यिक कार्यकर्ते प्रा. गंगाधर अहिरे यांना यावर्षीचा स्मृतीशेष कवी दिनकर साळवे स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती पुरस्कार समितीचे अध्यक्ष के. जी. भालेराव यांनी दिली.
रविवारी १२ मार्चला संगमनेरच्या व्यापारी असोसिएशन सभागृहामध्ये समीक्षक प्रा. मिलिंद कसबे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असून माजी आमदार डॉ. सुधीर तांबे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
संगमनेरमधील ज्येष्ठ लेखक समीक्षक स्मृतीशेष कवी दिनकर साळवे स्मृती पुरस्कार गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आला आहे. गतवर्षी हा पुरस्कार शेवगाव येथील लेखक आणि वंचितचे नेते प्राध्यापक किसन चव्हाण यांना देण्यात आला होता. दुसऱ्या वर्षीच्या पुरस्कारासाठी प्रा. अहिरे यांची निवड करण्यात आली आहे.
प्रा. गंगाधर अहिरे हे कवी, लेखक, संपादक व प्रख्यात व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच ते पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते, नेते व उत्कृष्ट संघटक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांचे सीमा सरकताहेत (कविता संग्रह), समता संगराची पन्नास वर्षे (वैचारिक संपादित ग्रंथ), कवी अरुण काळे व्यक्ती व वाड्मय (संपादित ग्रंथ), उभा माणूस पेटवा (लोककला, लोकगीतांच्या भाष्य), वादळाचे शिलेदार (व्यक्तिचित्रण), उजेडाचा जागर (वैचारिक लेखांचे पुस्तक), चिंतनाच्या तळाशी (समीक्षात्मक लेखन), कोयना:सर्प काळातील काही कविता (संपादित प्रातिनिधिक कविता संग्रह) आदी साहित्य प्रसिद्ध आहे.
त्यांना नाशिक महानगर पालिकेचा लोककल्याण पुरस्कार, कोकणातील दर्पण पुरस्कार, वाड्मय सेवा पुरस्कार, नगरचा कॉम्रेड अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. परिवर्त त्रैमासिकाचे ते संपादक आहेत. परिवर्त साहित्य संमेलनेही त्यांच्या पुढाकाराने होत आहेत. परिवर्त बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व नाशिकरोड येथील महात्मा फुले वाचनालयाचे ते विश्वस्त आहेत.
पुरस्कार समितीचे अध्यक्ष के. जी. भालेराव, संदीप वाकचौरे, प्रा. राहूल हांडे यांनी या पुस्तकाची घोषणा केली आहे. पुरस्कार समितीचे सूर्यकांत शिंदे, गौतमराव मिसाळ, पोपटराव सोनवणे, सचिन साळवे, बंटी यादव, विनोद गायकवाड, जिजाबाई हासे, सुखदेव मोहिते कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

