महाराष्ट्र संवाद न्यूज
सध्या राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. सोयाबीन, कापूस, भाजीपाला उत्पादकांसह कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. ज्या-ज्या वेळेस शेतकरी अडचणी आला त्या-त्या वेळेस सरकारने मदत करण्याची परंपरा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीबाबतचे स्पष्ट धोरण सरकारने त्वरित जाहीर करावे, अशी आग्रही मागणी माजी मंत्री आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बोलताना आमदार थोरात म्हणाले, भाजीपाला, कापूस, सोयाबीनसह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. नाशिकसह इतर तालुक्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. कांदा पिकासाठी उत्पादनासाठी खर्च ही मोठा आहे. यामुळे सध्या मातीमोल परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि विधानसभेतील सदस्यांच्या मागणीवरून सरकारने एक समिती आश्वासित केली आहे. मात्र या समितीमध्ये शेतकरी, व्यापारी यांचा कोणताही प्रतिनिधी नाही. याशिवाय या समितीने अहवाल कधी द्यायचा याबाबतची स्पष्टता नाही. शिवाय सरकारने नाफेडतर्फे कांदा खरेदी सुरू केली आहे, अशी चर्चा सुरू झाली. मात्र कांदा खरेदी कुठे सुरू आहे हे समजत नाही.
सध्या राज्यातील शेतकरी अत्यंत अडचणीत असून ज्या-ज्यावेळी शेतकरी अडचणीत आला आहे. त्या-त्या वेळेस सरकारने शेतकऱ्याला मदत केली, असा आपला इतिहास आहे. म्हणून सरकारने कोणतेही कारण न सांगता तातडीने शेतकऱ्यांना मदतीचे धोरण स्पष्टपणे जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांचे नेते आमदार थोरात यांच्या या मागणीमुळे राज्यातील शेतकरी वर्गामध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला आहे.

