महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर :
वाळू माफीयांवरील कारवाई कोणाला दडपशाही वाटत असेल तर, मला त्याची फिकीर नाही. माफीयांच्या तावडीतून प्रवरामाई मुक्त केली याचे समाधान मला आहे. या वाळूच्या विरोधात आदरणीय खासदार साहेबांनी सुध्दा मोठा संघर्ष केला. त्याच विचाराने आपण या अवैध वाळू तस्करीला लगाम घातला असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
तालुक्यातील जोर्वे येथे जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे १४ कोटी रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. निवृत्त पोलीस अधिकारी हरीभाऊ कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे तालुका अध्यक्ष सतीश कानवडे, शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, जेष्ठ नेते वसंतराव देशमुख, बापुसाहेब गुळवे, अशोकराव म्हसे, भगवानराव इलग, रोहिनीताई निघुते, दिलीप शिंदे, शरद थोरात, अरूण थोरात, दिलीप इंगळे, शिवाजीराव कोल्हे, गुलाबराव सांगळे गोकुळ दिघे यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री विखे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नगर जिल्ह्यात साडेचार हजार कोटी रुपयांची काम मंजूर झाली असून, संगमनेर तालुक्यात ८६१ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या असल्याचे सांगून भविष्याचा विचार करून प्रधानमंत्री योजनांची अंमलबजावणी करतात. जल जीवन मिशन हे ग्रामीण भागासाठी टाकलेल क्रांतीकारी पाऊल आहे.
राज्यात सेना-भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मागील ८ महीन्यात सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत १२ हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली असून, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगताना कांद्याच्या प्रश्नाबाबतही राज्य सरकार गंभीर आहे. पणनच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारशी बोलून अन्यही उपाय योजना करण्याची तयारी ठेवली आहे.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून कांदा प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनावर टिका करताना ते म्हणाले, यांना शेतकऱ्याप्रती कोणतेही घेणे देणे नाही. सत्ता गेल्याने आघाडीचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहे. राज्यात अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार सत्तेत होते तेव्हा यांना शेतकऱ्यांची आठवण झाली नाही. कोव्हीड संकटात यांच्या सरकारने बाजार समित्या बंद ठेवल्याने शेतकऱ्यांना आपला माल रस्त्यावर फेकून द्यावा लागला याची आठवण आंदोलन करणा-यांनी ठेवावी. तुमची आंदोलन ही शेतकऱ्यांसाठी नाही तर सत्ता गेल्याचे दुःख दाखविण्यासाठी आहेत आशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टिका केली.
विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रतिमा जगात उंचावली आहे. जी-२० परीषदेचे अध्यक्षपद भारताकडे येणे हा अभिमान आहे. कोव्हीड संकटात उपाय योजना करून हा देश मोदींनी सावरला. आज विविध योजनांमधून सामान्य माणूस विकासाच्या प्रक्रियेत समाविष्ट करण्याचे काम होत असल्याने देशात भारतीय जनता पक्षाचा जनाधार वाढत असून कसबा निवडणुकीच्या एका पराभवाने बदलाचे वारे दिसू लागलेल्यांच्या घराचे वासे फिरू लागले असल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात वयोवृध्द नागरीकांसाठी एसटीचा मोफत प्रवास, आनंदाचा शिधा, अंगणवाडी सेविकांचे मानधन आणि ७५ हजार नोकर भरतीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेला गती देवून चार हजार मेगॅवॅट वीज निर्मिती करून शेतकऱ्यांना बारा तास वीज देण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.
महसूल विभागाने सलोखा योजना सुरू केली असून वर्षानुवर्षे सुरू असलेले जमीनीचे वाद यामधून मिटतील. नगर जिल्ह्य़ात तीन महीन्यात सर्व मोजणीची प्रकरण निकाली काढण्याच्या सूचना दिल्या असून संगमनेर तालुक्याकरीता आणखी सहा रोव्हर मशीन उपलब्ध करून देणार आहे.
खरी दहशत तर तुमच्या तालुक्यातच : शालिनीताई विखे पाटील
काही वर्षांपुर्वी निमोण येथे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या झालेल्या सभेची आठवण करुन देत शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या की, या सभेला मी उपस्थित होते. सुजयचे भाषण चांगले झाले म्हणून उपस्थितांबरोबरच मीही टाळ्या वाजविल्या. परंतू त्याचेही भांडवल तालुक्यातील नेत्यांनी केले. मुलाच्या कौतुकासाठी टाळया वाजविणे गैर नाही, तुम्ही चांगले काम केले तरी, आम्ही टाळ्या वाजवू असा टोला लगावून खरी दहशत कोणाची किती आहे, हे अध्यक्ष असताना तुमचे जिल्हा परिषदेचे सदस्य मला खासगित येवून सांगत होते. तुमच्या तालुक्यातील गावांमध्ये एखाद्याला पत्ता विचारला तरी, लोकं घाबरतात, आमच्या राहाता तालुक्यात विरोधक असला तरी, त्याला घरापर्यंत नेवून सोडतील. खरी लोकशाही आमच्याकडे आहे अशा आक्रमक शैलीत त्यांनी निषाणा साधला.

