महाराष्ट्र संवाद न्यूज
शिर्डी :
अवकाळी पावसाने अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सांगलीसह काही भागाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. होळीचा सण राज्यभर साजरा होत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने राज्याच्या बहुतांश भागात थैमान घातले आहे. त्यामुळे अवकाळीच्या नुकसानीची आकडेवारी समोर आल्यानंतर मदत केली जाईल असा आश्वासन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.
अवकाळी पावसामुळे गहू, द्राक्ष, हरभरा, मूग अधिक शेती पिकांचे प्रचंड नुकसान होऊन पिके भूईसपाट झाले आहेत. त्यामुळे दुर्दैवाने अवकाळी पावसाचं शेतकऱ्यांवर संकट आले आहे, अशी भावना विखे पाटील यांनी बोलताना व्यक्त केली.
ते म्हणाले, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवली जात आहे. आतापर्यंत राज्य सरकारची भूमिका शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याची होती. मागच्यावेळी एनडीआरएफच्या निकषांच्या पलिकडे जाऊन मदत करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार बांधील असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. अवकाळी पावसाच्या नुकसानीची आकडेवारी समोर आल्यानंतर मदत करण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे.
सरकार शेतकऱ्यांविषयी किती काळजीपूर्वक मदतीचे नियोजन करत आहे याचीही त्यांनी माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मदतीविषयी बोलताना ते म्हणाले, आतापर्यंत जवळपास साडेचार हजार कोटींचे वाटप झाले आहे. त्याचबरोबर अजूनही वाटप सुरू असून त्याचाही आढावा घेतला जात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना मदत जाहीर केली जाणारच आहे, मात्र अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मदतीची रक्कम वितरित करण्यास अधिक गती येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

