महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर : पुण्याच्या कसबा पेठ व पिंपरी चिंचवडच्या पोट निवडणुकांचे निकाल बघता जनतेने सत्ताधाऱ्यांना नाकारले आहे. राज्यात भाजपा आणि शिंदे गटाची झालेली युती जनतेला मान्य नाही, ही वस्तुस्थिती स्पष्ट दिसत असून सत्ताधाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची भीती वाटत आहे अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष निवडी संदर्भात शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या बैठकीनंतर पवार माध्यमांशी बोलत होते.
सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त करत पवार म्हणाले राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. आज परदेशात मुलींना फसवून नेले जाते. राज्यात अत्याचाराचे प्रकार वाढले आहे. श्रीरामपूरची घटना देखील ताजी आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असताना अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी मोकळी दिली जात नाही. कोयता गॅंग, दुचाकी चार चाकी गाड्या पेटवून देण्याचे प्रमाण वाढत आहे.
राज्यात कांद्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या संदर्भात आम्ही दोन्ही सभागृहात आवाज उठवला. कांद्याच्या प्रश्नासंदर्भात सरकारने जे उत्तर दिले आहे ते योग्य नाही. सरकारने ज्या पद्धतीने हा प्रश्न हाताळायला हवा होता तसे घडले नाही. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गहू, हरभऱ्यासारखी उभी पिके जमीनदोस्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या होळीचा बेरंग झाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देत तात्काळ मंत्र्यांनी व प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्यायला हवेत. मात्र सरकार याकडे गांभीर्याने बघताना दिसत नाही.
आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव आहे. आगामी काळात आम्ही त्यांना दीडपट भाव देऊ, मदत करू, असे सत्ताधारी म्हणाले होते. त्यामुळे सगळ्यांना समाधान वाटले मात्र, दुर्दैवाने तसे घडताना दिसत नाही. उलट देशात गॅसचे, पेट्रोलचे दर वाढत चालले आहे. महागाई सुद्धा वाढत चालली आहे. बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे.
संभाजीनगर व धाराशिव हा नामांतराचा विषय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच घेतला होता. या दोन शहरांच्या नामांतर आम्ही महाविकास आघाडी सरकार असतानाच केलं. मात्र त्यानंतरच्या नामांतरासंदर्भातील गोष्टी या केंद्र सरकारच्या हातात असतात. नामांतर जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच महागाई कमी करणे, तरुण-तरुणींना रोजगार देणे याकडे देखील सरकारने लक्ष द्यायला हवे. असे देखील ठाकरे म्हणाले.

