मुंबई,
शेतकऱ्यांच्या शेतीला दळणवळणासाठी रस्त्याच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी गावनकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडीवाट, रस्ते, पाणंद, पांधण, शेतरस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्या-येण्याचे रस्ते खुले करण्यासाठी मिशन मोडवर विशेष अभियान राबवण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य अभिमन्यु पवार यांनी याबाबत लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली होती. मंत्री विखे-पाटील म्हणाले, राज्यातील शेत जमिनीची मोजणी, जमीन महसूलाची आकारणी व प्रथम जमाबंदीची कार्यवाही सन १८९२ ते १९३० दरम्यान पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामध्ये शेतजमीनीचे सर्व्हे निहाय गाव नकाशे तयार करण्यात आलेले आहेत. सदरचे सर्व्हे नंबरचे गाव नकाशावर मुळ जमाबंदीवेळचे विविध प्रकारचे रस्ते, गाडीवाट, पायवाट दर्शविलेले आहेत.
मुळ जमाबंदीचे वेळी तयार झालेले गाव नकाशे जीर्ण होत असल्याने ‘डिजीटल इंडिया भूमि अभिलेख अद्यावतीकरण कार्यक्रम’ अंतर्गत राज्यातील भूमापन नकाशांचे डिजीटायजेशनचे काम सुरु करण्यात आले असून 6 जिल्ह्यांमध्ये डिजीटायजेशन काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरीत 28 जिल्ह्यातील भू-नकाशांचे डिजीटायजेशन करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच हे रस्ते खुले करुन देण्यासाठी अभ्यासगट नेमण्यात येईल, असेही महसूलमंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.

