महाराष्ट्र संवाद न्यूज
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यावर आज सक्तवसुली संचालनालयाने धाड टाकल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मनी लाँड्रिंग प्रकरणी झालेल्या या कारवाई प्रकरणी कोर्टाने हसन मुश्रीफ यांना तात्पुरता दिलासा दिला आहे. या दरम्यान ईडीने हसन मुश्रीफ यांना सोमवारी चौकशीसाठी मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
मुश्रीफ यांच्यावर आज सक्तवसुली संचालनालयाने धाड टाकत तब्बल साडे नऊ तास चौकशी केली. मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागलमधील निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहोचले होते. ईडीने दोन महिन्यात केलेली ही तिसरी छापेमारी होती. दरम्यान ईडीने आता नव्याने हसन मुश्रीफ यांना समन्स बजावलं असून पुढील आठवड्यात मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. साखर कारखान्यातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असून चौकशी केली जाणार असल्याचं ईडीने सांगितलं आहे. मुंबईच्या ईडी कार्यालयातुन हे समन्स बजावण्यात आलं आहे.
आम्हाला गोळ्या घाला – मुश्रीफ यांची पत्नी
ईडीचे अधिकारी सकाळी सात वाजताच हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी दाखल झाले होते. दरम्यान छापा टाकण्यात आला तेव्हा हसन मुश्रीफ घरी नव्हते. अधिवेशनासाठी ते मुंबईत असताना ही कारवाई झाल्याने समर्थक मोठ्या प्रमाणात घराबाहेर जमले होते. घरात लहान मुलं आणि मोठा मुलगा आजारी असतानाही ईडीकडून चौकशी होत असल्याचं मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी आपल्याला गोळ्या घाला अशी संपप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
मुंबई हायकोर्टाचा मुश्रीफ यांना दिलासा
ईडीच्या छापेमारीदरम्यान मुंबई हायकोर्टानं हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा दिला. कोल्हापुरात ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा यासाठी हसन मुश्रीफ यांना कोर्टात धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान कोर्टाने हसन मुश्रीफ यांच्याविरोधात 24 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करु नये असे निर्देश पोलिसांना दिले. दरम्यान याचवेळी कोर्टाने हसन मुश्रीफ प्रकरणात तक्रारदार किंवा याचिकाकर्ता नसतानाही कोर्टाच्या आदेशाची तसंच एफआयआरची प्रत किरीट सोमय्यांना उपलब्ध झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत. पुणे सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी हे चौकशीचे आदेश दिले आहेत. हसन मुश्रीफ यांची मुले सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात संचालक आणि भागधारक आहेत. या कारखान्यात गैरव्यवहाराच्या माध्यमातून पैसे आल्याचा आरोप आहे. ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे.

