महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर:
संगमनेर तालुक्यातील जनतेने आपल्यावर प्रेम केले आहे. सत्ता असो अथवा नसो, तरीदेखील आपण तालुक्यातील विकास कामांचा वेग कायम राखला असून जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी काम केले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
शहरालगत नव्याने स्थापित झालेल्या ढोलेवाडी ग्रामपंचायत स्थापनेच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये ते बोलत होते. यावेळी रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, राष्ट्रवादीचे नेते आबासाहेब थोरात आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
थोरात म्हणाले, गुंजाळवाडी ग्रामपंचायतचे विभाजन झाले असून ढोलेवाडीला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा मिळाला. 34 कोटी रुपयांच्या निधीतून ढोलेवाडी व गुंजाळवाडी ग्रामपंचायतसाठी पाणीपुरवठा योजना राबविली आहे. यामुळे दोन्ही गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. स्थानिक नागरिकांच्या आग्रही मागणीनंतर ढोलेवाडी ग्रामपंचायत स्वतंत्र केले यामुळे ढोलेवाडीच्या विकासाला चालना मिळणार असून सर्वांनी विकासासाठी एकत्रित अधिक जोमाने काम करावे.
सत्ता असताना आणि नसताना देखील तालुक्यातील विकास कामांच्या वेग कायम राहिला. अडचणीचा काळ येत असतो मात्र, त्यातून मार्ग काढून आपण पुढे जाणार आहोत. शेवटी विजय हा सत्याचा होत असतो.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले, थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना या गावच्या विकासासाठी आपण काम केले आहे. ढोलेवाडी हे गाव शहरालगत असल्याने या परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
ढोक महाराज म्हणाले, ग्रामपंचायत वेगळी झाल्याने नवीन प्रपंच सुरू झाला आहे. एकीने आणि नेटाने विकासाचे काम करा. संगमनेर तालुका सात्विक विचारांचा असून हीच परंपरा यापुढील काळात नागरिकांनी जोपासावी.
प्रास्ताविक अभिजीत ढोले यांनी केले सूत्रसंचालन दिलीप पवार शरद बटवाल व पोपट आगलावे यांनी केले तर सुधाकर ताजने यांनी आभार मानले.

