महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई :
राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे, अशा स्थितीत राज्य सरकारने कांद्याला प्रती क्विंटल तीनशे रुपये अनुदान जाहीर केले आहे. ते अत्यंत तुटपुंजे असून कांदा उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चाचा विचार करता सरकारने हे अनुदान किमान पाचशे रुपये करावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
विधान भवन परिसरात थोरात माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, अवकाळी पावसाने शेतातील उभे पीक वाया गेले. सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, भाजीपाला, कांद्याला बाजारात भाव नाही. त्यामुळे शेतकरी आपल्या पिकांवर नांगर फिरवत आहे. कांद्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण केले आहे. एक क्विंटल कांदा उत्पादनासाठी साधारणता अकराशे ते बाराशे रुपये खर्च येतो. कांदा काढण्यासाठी क्विंटलला तीनशे रुपये लागतात. हा खर्च बघता शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेले तीनशे रुपयांचे अनुदान तुटपुंजे आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली.
अर्थसंकल्पावेळी सरकार शेतकऱ्यांवर मेहरबान असल्याचे चित्र दाखविले गेले, घोषणाच घोषणा करण्यात आल्या. प्रत्यक्षात मात्र आता शेतकऱ्यांना मदत करताना सरकार आखडता हात घेत आहे, हे दिसून आले. संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करुन किमान ५०० रुपये तरी द्यावेत, अशी मागणी थोरात यांनी केली.
कृषिमंत्र्यांवर कारवाई करा
“शेतकरी आत्महत्या तर नेहमीच होतात”, असे असंवेदनशील विधान करुन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणे सरकारचे काम आहे. परंतु ते न करता सरकारमधील मंत्री शेतकरी आत्महत्यांबद्दल असे खोडसाळ विधान करतो, हे निषेधार्ह आहे. मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्री सत्तार यांच्या विधानाची तातडीने दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असे थोरात म्हणाले.

