महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर:
काँग्रेस पक्षाला त्याग आणि बलिदानाची परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत या पक्षाचा इतिहास दैदिप्यमान असा राहिला. मात्र पुढील काळात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करावे लागणार असून, महाराष्ट्रात सध्या वातावरण बदलत आहे. काँग्रेस पक्षाबद्दल जनतेत पुन्हा अनुकूलता निर्माण होत असून आगामी काळात पक्ष पुन्हा जोमाने उभारी घेईल, असा विश्वास माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र नागवडे यांची निवड झाल्याबद्दल सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित सत्कार समारंभावेळी आमदार थोरात बोलत होते. यावेळी करण ससाने, महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्ष रूपवते, सचिन गुजर, संपतराव म्हस्के, मधुकरराव नवले, प्रताप शेळके, हेमंत उगले आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांचे हित जोपासणारा पक्ष असून या पक्षाने कायम समतेचा विचार अंगीकृत केला आहे. आव्हाने आणि अडचणी काँग्रेस पक्षासाठी नवीन नाहीत. पुढील काळात काँग्रेसला चांगले दिवस येणार आहे. या पक्षात तरुणांनाही संधी आहे. सध्या राज्यात सुरू असलेले राजकारण व सरकार जनतेला मान्य नसून आता जनतेतही पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाबद्दल अनुकूलता निर्माण होताना दिसत आहे.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभरात काँग्रेसला नवचैतन्य मिळवून दिले आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला चांगले वातावरण असून लोकसभेच्या काँग्रेसच्या जागांमध्ये यावेळी वाढ होणार आहे. नागवडे कुटुंब हे कायम काँग्रेस पक्षाबरोबर राहिले. शिवाजीराव नागवडे यांनी श्रीगोंदा तालुक्यात सहकारात मोठे काम केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजेंद्र नागवडे कारखाना चांगला चालवत असून अनुराधा नागवडे यांचे महिला संघटनही कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
यावेळी राजेंद्र नागवडे, करण ससाने, ज्ञानदेव वाफारे, मधुकरराव नवले, लता डांगे, आकाश नागरे, भैय्या वाबळे, प्रशांत दरेकर, सचिन गुजर आदींची भाषणे झाली.

