महाराष्ट्र संवाद न्यूज
शिर्डी,
शिर्डी येथील फुलविक्रीबाबत जिल्हाधिकारी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून पुढील दहा दिवसांत संस्थांनमध्ये फुलविक्री सुरू करण्यात येईल. यात फक्त आजूबाजूच्या परिसरातील सातबाराधारक शेतकऱ्यांना फुल विक्रीला परवानगी देण्यात येईल. अशी माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
राहाता तालुक्यातील नांदुर्खी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण व विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते.
विखे-पाटील म्हणाले, संस्थान दर्शन रांगेत अधिकृतरित्या फुलविक्री सुरू करण्यात येईल. साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गरज लक्षात घेऊन आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी शेती करावी. शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लॅंडीग सेवा सुरू होणार आहे. ५०० कोटींच्या नवीन टर्मिनला मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे या विमानतळावर एकाच वेळी दहा विमाने थांबतील. याचबरोबर समृध्दी महामार्गामुळे आजूबाजूच्या परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे. शिर्डीच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
सरकारी वाळू लिलाव बंद करण्यात येऊन शेतकऱ्यांना घरपोच जागेवरच ६०० रूपये ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात येईल. यातून सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व पाणंद व शिवरस्ते मोकळे करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. शेतजमीन मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर एक महिन्याच्या आत रोव्हर तंत्रज्ञानाने मोजणी करून शेतकऱ्यांना नकाशा प्रमाणपत्र देण्याच्या उपक्रम अहमदनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाला आहे.
राहाता, संगमनेरमधील शेतकऱ्यांना विम्यापोटी साडेआठ कोटी रूपयांची भरपाई देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेच्या कामांचे फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाच्या पैशाचा अपव्यय थांबविण्यासाठी कोणाला पाठीशी घातले जाणार नाही.
यावेळी व्यासपीठावर शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव, संगमनेर प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, पंचायत समितीचे किरणकुमार अरगडे, संजयकुमार गायकवाड, देविदास धापटकर, नांदुर्खी सरपंच माधवराव चौधरी, उपसरपंच विरेश चौधरी, राजेंद्र चौधरी, काशिनाथ गुंजाळ, बाळासाहेब डांगे आदी उपस्थित होते.

