महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्य सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या विधानसभेत आज मोठा गोंधळ बघावयास मिळाला. आशिष शेलार यांनी तर थेट बाळासाहेब थोरात यांना आव्हान आव्हान दिल्याचे दिसून आले.
खासदार राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी गुरुवारी सभागृहामध्ये सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) लावून धरली. या मागणीवरून सभागृहात बराच काळ गोंधळ देखील बघावयास मिळाला. भाजप आमदार आशिष शेलार आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांचा यात समावेश होता.
आशिष शेलार म्हणाले, भारताबाहेर भारताचा अपमान केल्याबद्दल तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागायला हवी. काँग्रेस नेत्यांनी माफी मागितली पाहिजे. शेलार यांनी याप्रकरणी बाळासाहेब थोरात यांनाच भर सभागृहात आव्हान देत “बाळासाहेब थोरात तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही या प्रकरणी माफी मागा” अशी मागणी केल्याचे दिसून आले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात सुरू असलेला आमदार यांचा गोंधळ थांबण्याचा बराच वेळ प्रयत्न केला मात्र, गोंधळ घालणारे सत्ताधारी आमदार काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे अखेरीस अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित करत असल्याची घोषणा केली आणि ते सभागृहातून बाहेर पडले.

