महाराष्ट्र संवाद न्यूज
खरंतर एखाद्या गोष्टीत वादाला प्रतिवादाने उत्तर द्यायला हवे. जेथे वाद निर्माण होतो तेथे प्रतिवादाने उत्तर द्यायला पाहिजे मात्र सावरकर प्रश्नी भारतीय जनता पक्ष प्रतिवाद करण्यास तयार नाही, अशी टीका माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
थोरात संगमनेरमध्ये माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या प्रत्येक पक्षामध्ये मत-मतांतर विचारधारा वेगवेगळी असू शकते. मात्र आम्ही किमान समान कार्यक्रमावर आधारित काम करीत होतो. यापुढेही करीत राहू.
काँग्रेसचे युवा नेते खासदार राहुल गांधी यांनी अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध काय? हा प्रश्न उपस्थित केला असता, याला भाजपने उत्तर द्यायला हवे होते. मात्र उत्तर न देता त्यांचा थेट आवाजच कसा बंद करता येईल यावरच भाजप जोर देत असल्याची टिका केली.
राज्यघटनेत सत्ताधारी पक्ष आहे. तसा विरोधी पक्ष आहे. सत्ताधाऱ्यांचे काम जसे देश किंवा राज्य चालवणे असते. तसे कुठे चुकत असेल तर त्यावर बोट ठेवण्याचे काम विरोधकांचे असते. मात्र विरोधक काही बोलले की लगेच त्यांचा आवाज कायमस्वरूपी बंद करायचे एकमात्र काम भाजपच्या नेत्यांचे सुरू झाल्याचा आरोप आमदार थोरात यांनी यावेळी केला.
फूट पाडण्याचा प्रयत्न, पण फूट पडणार नाही…
भाजपचा महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु आमच्यात फूट पडणार नाही. आम्ही किमान समान कार्यक्रमावर आधारितच काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

