महाराष्ट्र संवाद न्यूज
राहाता (अहमदनगर) :
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानत शेतकरी कर्जमाफीसह अनेक लोक कल्याणकारी निर्णय घेतले. भाजपची सध्याची कार्यपद्धती जनतेला मान्य नाही. खड्ड्यांमधून जाणारा आणि मृत्यूचा सापळा बनलेला नगर-मनमाड रस्ता वर्षानुवर्ष सत्ता असून देखील का होत नाही? असा असा प्रश्न उपस्थित करत शिर्डी मतदारसंघातील दहशतीचे झाकण उडविण्याचे आवाहन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
राहाता येथे महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात थोरात बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व भाऊसाहेब कांबळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पंकज लोंढे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधीर म्हस्के, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुजीब शेख व प्रमोद लबडे, महेंद्र शेळके, अनिल भांगरे, तालुका प्रमुख सचिन कोते, रावसाहेब बोठे, डॉ. एकनाथ गोंदकर, लता डांगे, सुरेश थोरात, श्रीकांत मापारी, प्रभावती घोगरे, जनार्दन घोगरे, विक्रांत दंडवते, समीर दंडवते, समीर करमासे, नंदकुमार सदाफळ, अण्णा कोते, महेंद्र शेळके, सुभाष निर्मळ, अरुण कडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ताराचंद म्हस्के, शीतल लहारे, शिर्डीतील काँग्रेस नेते मामा पगारे आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने सहज पद्धतीने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली. कोरोना काळात सरकारने केलेल्या कामाचे कौतुक आंतरराष्ट्रीय पातळीवर झाले. मात्र गेल्या नऊ महिन्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात एकमेकांवर केलेले आरोप, सरकारमधील लोकांची वागण्याची पद्धती पाहता राजकारणाचा पोत सध्या रसातळाला गेला आहे. सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करताना त्याच क्षणी भाजपची कार्यपद्धती जनतेला मान्य नसल्याने राज्यातील सरकार देखील कोसळलेले असेल. राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना देशाचे पंतप्रधान उत्तर देत नाहीत. महागाई बेरोजगारीवरील लक्ष हटविण्यासाठी धार्मिक मुद्दे पुढे केले जातात.
वैभवशाली तालुका अशी राहात्याची ओळख होती. मात्र गेल्या काही वर्षापासून या तालुक्याचा विकास खुंटला आहे. वर्षानुवर्ष सत्ता असताना देखील नगर मनमाड रस्ता होत नसल्याने मृत्यू सापळा म्हणून हा रस्ता राज्यात खूप प्रसिद्ध झाला आहे. आपण लोकशाही मानणारे आहोत. कधीही इतर तालुक्यांमध्ये ढवळाढवळ केली नाही. मात्र येथील दहशतीला लोक आता कंटाळले आहेत. सर्वांनी एकत्र येऊन सर्व निवडणुका लढवा. शिर्डी मतदार संघातील दहशतीचे झाकण जनतेच्या एकीतून उडवायचे आहे.
६० वर्ष सुरू असलेला शेती महामंडळासाठीचा लढा आपल्या महसूल मंत्री पदाच्या काळात तातडीने सोडविला. जनतेला पिचवत ठेवायचे झुलवत ठेवायचे हे येथील राजकारण असल्याने या प्रश्नाच्या संघर्षाला इतकी वर्ष लागली. आपण सर्वसामान्य जनतेबरोबर असून लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी मजबूतपणे एकत्र या, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. तांबे म्हणाले, सध्या देशात लोकशाहीची घसरण होते आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. आमदार थोरात यांनी कायम सुसंस्कृत राजकारण केले. विचारांची बांधिलकी ठेवली. पक्षनिष्ठा ठेवून काम केले. सत्ता ही लोकांच्या प्रगतीसाठी असते, लोकांना त्रास देण्यासाठी नाही असा टोलाही त्यांनी लगावला.
भाऊसाहेब कांबळे म्हणाले, मविआ सरकारने विकास कामांसाठी दिलेल्या निधीतून होणाऱ्या कामांचे उद्घाटन या सरकारमधील मंत्री करत आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते ताराचंद म्हस्के, प्रभावती घोगरे, श्रीकांत मापारी, सचिन चौगुले, सुधीर म्हस्के, प्रमोद लबडे, अशोक थोरे, नानाभाऊ बावके, मनसेचे विजय मोगली, धनंजय गाडेकर आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एकनाथ गोंदकर यांनी, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. ॲड. पंकज लोंढे यांनी आभार मानले.
◇ दिवाळी 2022 ला निळवंडे कालव्यांचे पाणी देण्यासाठी काम केले…
अनेक अडचणीवर मात करून आपण निळवंडे धरण पूर्ण केले. याचबरोबर कालव्यांच्या कामांसाठी मोठा निधी मिळवला. ऑक्टोबर 2022 मधील दिवाळीच्या पाडव्याला उजव्या व डाव्या कालव्यांना पाणी आणण्यासाठी आपले उद्दिष्ट होते. मात्र नवीन सरकार आले आणि सर्व कामे थांबली आहेत तरीही आपणच या कामांचा पाठपुरावा करत आहोत.
○○ बाजार समिती सर्व निवडणुका ताकतीने लढवा…
संपूर्ण राज्यात आणि अहमदनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे. बाजार समितीसह येणाऱ्या सर्व निवडणुका लोकशाही पद्धतीने सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण ताकतीने लढवा. विजय आपला नक्की होणार असून परिवर्तनाची सुरुवात होईल असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

