रविवार विशेष लेख
उध्दव ठाकरे बोलले काय आणि राज्याचे गृहमंत्री त्यावर उत्तरले काय? भलताच कॉन्फिडन्स गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचा आलेला दिसतो आहे. मंत्री म्हणून असलेल्या जबाबदारीची जाणीव कोण्या नेत्याने एका फालतू शब्दाने करून दिली म्हणून थेट काडतूसं घालण्याची भाषा गृहमंत्र्याने वापरावी? महाराष्ट्र इतका खाली आलाय? पोलीस आपल्या हातात असल्याचा असा फायदा कोणाला घेता आला नाही. फडणवीसांनी तो गेल्या काही वर्षांमध्ये घेतला. ते कोणत्या थराला जाऊ शकतात हे सार्या देशाने पाहिलं. इतकं करून ते थांबत नाहीत आपल्या कृत्याची उघड भलामणही ते करतात आणि त्या निमित्ताने एखाद्याला खंडणीखोर आणि दुसर्याला देशद्रोहीही संबोधतात.
सत्ता बेफाम सत्तेतला गृहमंत्री असा बेदरकार झालेला कोणी कधी पाहिला नाही. महाराष्ट्राने तर नाहीच नाही. सभागृहात हात उचलण्याचे प्रकार झाले. पुढे त्यातल्या म्होरक्यांनाही आपल्या कृत्याचा पश्चाताप करायला लावला. मात्र काडतुसं घालण्याचा प्रकार तर नवाच उदयाला आला आहे. फालतू सरकार, फडतूस मंत्री असले शब्द तर आपल्या बोली भाषेतील सामान्य शब्द. असे शब्द उच्चारले म्हणून कोणी फडतूस होत नसतो. यामुळे त्याचा कोणी किती बाऊ करायचा, यालाही काही मर्यादा असतात.
आपल्या कार्यकर्तीवर अत्याचार होऊनही तिची दखल न घेण्याच्या प्रकाराने संतप्त झालेला कोणीही नेता अशी प्रतिक्रिया देऊ शकतो. भले ती प्रतिक्रिया जहाल जरी असली तरी जबाबदार असलेल्या व्यक्तीने त्यावर कसं रिअॅक्ट व्हावं याला काही बंधनं असतात.
ज्या गृहमंत्र्यांचे पोलीस अत्याचार झालेल्या महिलेवरच अन्याय करत असतील तर त्या गृहमंत्र्यांनी कोणी पूजा थोडीच करणार? अशा प्रसंगात समोर माणसं दिसली म्हणून काहीही कोणी बोलू शकत नाही. जबाबदार फडणवीसांनी स्वत:ला आवर घालायला हवा होता. अशी काडतूसं घालण्याची भाषा कोणी इतरांनी केली असती तर फडणवीसांनी काय केलं असतं? रॅपर राज मुंगासे याने केवळ 50 खोक्यांचं गाणं काय गायलं आणि त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्याने गुन्हा नोंदवला. महाराष्ट्राचे पोलीस कोणत्या वळणावर आहेत, याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. तरीही आपलं कोणी गुणगाण गावं, असं फडणवीसांना वाटत असेल तर ते अनादी काळात वावरतात असंच म्हणता येईल.
फडतूस शब्दाचा अर्थ फडणवीस यांनी एकदा मराठी शब्दकोषात अवलोकला पाहिजे. ते तर उच्चशिक्षा विभूषित. मग तर त्यांना महाराष्ट्राच्या बोलीभाषेची जाण असलीच पाहिजे. एखाद्या व्यक्तीला त्याच्या कर्तुत्वाची जाणीव करून देण्यासाठी असे शब्द वापरावेच लागतात. काम आगलावायचं करायचं आणि पाठीवर थाप मारून घेणारे शब्दप्रयोग कोणी कोणासाठी वापरत नाहीत. भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी… या एका शब्दात संत तुकारामांनी मराठीचा ठेवा दाखवून दिला आहे. तेव्हा फडतूस शब्दाचा इतका बाऊ करण्याची आवश्यकता नव्हती. यासाठी काडतुसांचा वापर तर भलताच अतिरेकी म्हणता येईल.
असली काडतुसं घेऊन फिरणारे भाजपमध्ये काही कमी नाहीत. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर किती खालच्या पातळीवर हे नेते टीका करतात हे उभा महाराष्ट्र जाणतो. यातल्या अनेकांना तर सार्या महाराष्ट्राची माफी मागावी लागली होती. त्यात तर उध्दव ठाकरे यांच्यावर भाजपेयींचं विशेष प्रेम. त्यांच्या मातोश्रीपासून ते त्यांच्या मुलांपर्यंत आणि रश्मी ठाकरेंपासून उध्दवपर्यंत कोणत्या थराची टीका भाजपचे नेते करतात ती एकदा फडणवीसांनी ऐकावी. आपल्या नेत्यांना आवर घालण्याचा एकदाही प्रयत्न फडणवीसांनी केलेला दिसला नाही. भाजपशी फारकत घेतल्यापासून तर भाजपचे नेते नागडे झाल्यासारखी टीका उध्दव ठाकरेंवर करत असतात.
उध्दव आणि आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काडतुसं घुसवण्याची भाषा कधी केल्याचं आठवत नाही. भाजपचे नेते शरद पवार यांच्यावर कोणत्या थराची भाषा वापरतात? खासगीत ते पवारांना काय म्हणतात हे एकदा फडणवीसांनी ऐकावं. राष्ट्रवादीच्या नेत्याने त्यांच्याविरोधात काडतुसं घुसवण्याची भाषा वापरल्याचं आठवत नाही. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात नीच शब्दप्रयोग करणार्या अब्दुल सत्तार यांच्या विरोधात कारवाई करण्याचं धाडस फडणवीस दाखवू शकले नाहीत.
भाजपच्या या काडतुसर्यांपासून फडणवीस थोडे अलिप्त होते. त्यांच्या मनात काहीही घोळत असलं तरी ते उघडपणे व्यक्त होत नसंत. मागल्या दाराने आपली कामं वाजवणार्यांपैकी त्यांची इमेज होती. आता ते उघडपणे धमकावू लागल्याचं या प्रकरणावरून दिसू लागलं आहे. स्वत:ला शुचिर्भूत समजणारा एक मंत्री इतका वाह्यात बोलू शकतो, हे महाराष्ट्राने प्रथमच पाहिलंय. फडणवीसांचं हसरं तोंड असं काडतुसांनी भरलंय हे महाराष्ट्रातल्या जनतेला पाहायला मिळालं आहे.
शिवसेनेच्या अस्तित्वावर घाला घालणाच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकारणाने घेतलेली खालची पातळी सार्या देशाने पाहिली. या मोहिमेचे जनक हे देवेंद्र फडणवीस आहेत, हे एव्हाना सर्वांनाच ठावूक आहे. कोणीतरी विजय शिवतारे उठतो आणि आघाडी फोडण्यासाठी फडणवीसांबरोबर दीडशे बैठका घेतल्याचं सांगतो. यावरून सेनेची पाळेमुळे उखडून टाकण्याचा वसा फडणवीसांनी घेतला होता, हे लपून राहिलेलं नाही. अशावेळी फडणवीसांवर उध्दव ठाकरे यांचा विशेष राग असणं स्वाभाविक आहे. त्यात आपल्याकडील गृहखात्याचा गैरवापर तेच फडणवीस करत असतील तर त्यांचा समाचार घेतला जाणार यात संदेह नाही.
अशात रोशनी शिंदे या ठाण्यातल्या कार्यकर्तीने केलेल्या टीकेवर तिला ज्या प्रकारे अद्दल घडवली गेली, तरी कोणावरच कारवाई होत नाही. उलट मारहाण झालेल्या शिंदेंवरच गुन्हा नोंदवण्याचा ठाणे पोलिसांचा कारभार केवळ उरफाटाच नाही तर आपलं इमान विकणाराही ठरला आहे. यावरील राग उध्दव यांनी फडतूस गृहमंत्री या शब्दात घेतला तर इतकं चवताळण्याचं कारण काय? जिथे गैरवाजवी काम होणार असेल तर तिथे कोणी कौतुकाची थाप देणार नाही. शब्दांच्या पैजारा ह्या घ्याव्याच लागतात. हे ज्यांना सहन होत नाही त्यांना जबाबदारीचं पद घेण्याचा अधिकार नाही.
उध्दव ठाकरेंच्या एका शब्दाचा इतका बाऊ करणार्या फडणवीसांना आपल्या सवंगड्यांनी छत्रपती शिवरायांवर केलेली टीका बरी चालते. छत्रपती शिवरायांवर अश्लाघ्य टीका करणार्या आपल्या नालायक प्रवक्त्याला त्यांनी समज दिली असं कधी ऐकायला मिळालं नाही. छत्रपतींसह इतर समाज सुधारकांवर टीका करणार्या राज्यपाल कोश्यारींचा समाचार घेताना फडणवीस दिसले नाहीत. उलट शिवरायांची छत्रपती होण्याची लायकी नव्हती असं म्हणणार्या सावरकरांच्या नावाने राजकारण करून महाराष्ट्राला मागे खेचण्याचे उद्योग त्यांनी सुरू केलेत. माणसं शिकली म्हणजे शहाणी झालीच असं नाही. उलट जी अशिक्षित असतात तीच ज्ञानी आणि शहाणी असतात असं म्हणण्याची वेळ फडणवीसांनी आणून ठेवली आहे.
फडणवीस यांनी राजकीय जीवनात काही कमी फडतूसपणा केला नाही. आजवरच्या राजकरण्यांमध्ये त्यांच्याच नावावर याची अधिकतर नोंद झाली असेल. राज्यातील राजकारण गलिच्छ करण्याचा सर्वाधिक फडतूसपणा फडणवीसांनीच केला. प्रचंड खोटं बोलायचं आणि समोरच्याला नामोहरम करायचं यातील त्यांचा फडतूसपणा तर पराकोटीला पोहोचला आहे. विरोधी पक्षातल्या नेत्यांना चौकशांच्या फेर्यात अडवण्याच्या त्यांच्या कलाकारीने तर सार्या राज्याला मान खाली घालायला लावली आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी दाखवलेल्या असंवेदनशीलतेने तर अगदीच निम्न स्तर गाठला होता. या काळात त्यांनी केलेल्या फडतूसपणाचा फटका त्यांना नाशिकच्या हॉस्पिटलला भेट दिली तेव्हा बसला. आपल्यावरच असे प्रसंग का ओढावतत, वा आपल्यालाच फडतूस का संबोधलं जातं, याचा फडणवीस यांनी अगदी शांतचित्ताने विचार केला पाहिजे. राजकारण आज आहे ते उद्या असेलच असं नाही. पण माणुसकी ही तहहयात साठवून ठेवण्याची क्रिया आहे. ती लोप पावली की लोकं फडतूसपणाचा शिक्का मारतात हे फडणवीस यांनी लक्षात घ्यायला हवं.
प्रवीण पुरो, मुंबई.

