विसावं शतक मागे टाकून 21 व्या शतकाच्या सुरुवातीलाच माहिती तंत्रज्ञान उदयास आले आणि मानवी जीवनाची स्पर्धा तंत्रज्ञानाशी सुरू झाली. त्यामुळे स्पर्धा आणि गतीच्या विळख्यात मानवी जीवन अडकले. अनेक बदलांना सामोरे जात संभ्रमांच्या वर्तमानातून मार्ग काढत संघर्ष आणि अनेक स्पर्धांचं आव्हान पुढच्या पिढ्यांना झेलायची आहेत. खरंतर अनेक स्वप्न घेऊन आपण एकविसाव्या शतकात प्रवेशिलो. परंतु माध्यमक्रांतीमुळे संधीसोबत प्रचंड अशा संघर्ष आणि स्पर्धेच्या युगात त्या स्वप्नांची पडझड होतांनाचा हा काळ म्हणजे कोलाज ही कादंबरी होय. डॉ. अशोक लिंबेकर यांनी आपल्या सभोवतालचा काळ जोखताना भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांचा स्वर एकत्र करत समाजवास्तवाचा आरसा आजच्या तरुणांसमोर ठेवला आहे.
कादंबरीतील नायक हा ग्रामीण भागाशी नाते जोडणारा असल्यामुळे त्या भाषेतील अनेक संवाद, प्रसंग, आशय-विषयाला अधिक प्रभावी करतात. सहज, सोप्या, ओघवत्या शैलीत केलेली मांडणी, विनोद आणि घटनेचं गांभीर्य मनाला भिडते. अर्थात बोलीभाषेचं हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. कादंबरीतील नायक देखील मनस्वी आनंद घेणारा, संवादी, संवेदनशील, व्यासंगी असा सदानंद हा नावाला साजेसा आहे. अनेक संवादी-विसंवादी अनुभव, प्रसंग आणि घटनांकडे पाहत आपल्याच भूतकाळाच्या चिंतनातून आयुष्याचा अर्थ शोधावा, हे या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे. ही कादंबरी म्हणजे व्यक्तीचित्र, वातावरण, भाषाशैली, निरीक्षण, अनुभव, घटना आणि वास्तव या घटकांना स्पर्श करत विद्यार्थीदशेपासून ते प्रौढतेपर्यंतचा प्रवास अधोरेखित करत, आजच्या वर्तमानाला भिडते. प्रसंगानुरूप समर्पक अशी काव्यांची आठवण, अभंग यांचा संदर्भ देत लेखकाच्या व्यासंगी, संवेदनशील आणि रसिकतेची ओळख होते.
1990 नंतरच्या जागतिकी आणि उदारीकरणाच्या काळात सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक आणि राजकीय क्षेत्रातील बदल, परिणाम अशा विविध परिप्रेक्ष्यातून या कादंबरीची जडणघडण होताना दिसते. जत्रा आणि सप्ताहाच्या नावाखाली सामाजिक आणि सांस्कृतिक विचारांचे खंडन करून चंगळवाद, अंधश्रद्धा आणि कर्मकांडाकडे नव्या पिढीला घेऊन जाणाऱ्या झुंबररावसारख्या प्रवृत्तीने समाजाचे सर्वांगाने नुकसान केले. यामुळे ग्रामीण भागातील समाजमनाची कर्मकांडातून सुटका झाली नाही. भौतिक विकास झाला, परंतु कर्मठ विचारांमुळे गावपण हरवले. संतांचे विचार, शिकवण आणि भक्तीचा मार्ग हा विलक्षण अध्यात्मिक सुखाची अनुभूती देतो. तुकोबांच्या अभंगांनी अवघ्या महाराष्ट्राच्या वाणीला अमृताची गोडी दिली. शब्दांना रत्नांची जोड देऊन खरे धन आणि शस्त्र म्हणजे शब्द अशी अमर्याद, अथांग अशी व्याख्या तुकोबांनी केली. अशा या संतांची मौलिकता आणि विवेक बाजूला ठेवून भक्तीच्या नावाखाली पैशाची उधळण करत समाजमन गढूळ आणि दूषित झाले. त्याला विरोध म्हणून सुभानराव सारख्या तरुणांनी पुकारलेले बंड, विसंवाद त्यातून जुन्या- नव्यातील संघर्षामुळे गावपण हरवले. हे समाजवास्तव नायकाला अस्वस्थ करते.
महाविद्यालयीन जीवनात भविष्यातील स्वप्नांची गुंफण करत कथेतील नायक स्वतःला कवी, लेखक, प्राध्यापक होण्याचे स्वप्न रंगवतो. परंतु या क्षेत्रात देखील विवेकीपण हरवलेल्या प्राध्यापकाकडून नव्या पिढीच्या शिलेदारांना नाउमेद करताना ही पिढी कोणत्या मार्गाने जाईल. जायला हवी. याचा विचार न करता त्यांच्या भावविश्वाशी खेळताना त्यांच्या संवेदना, स्वप्नांबद्दल शून्यचिंतन करणारे, प्राध्यापक म्हणून दिमाखाने वावरतात याचे नायकाला आश्चर्य वाटते. परंतु त्यातील काही आदर्श अनुसरणातून कथेतील नायक पुढे प्राध्यापक म्हणून नोकरी मिळवतो. जीवनात आलेले अनुभव, प्रसंग, घटनांना डोळसपणे पाहत, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाच्या काळात आजच्या गतिमान शिक्षणातील हरवलेली नीतिमानता, शिक्षण व्यवस्थेतून होणारे राजकारण, बाजारीकरण, त्यातून होणाऱ्या मूल्यांची पडझड असे हे शिक्षण व्यवस्थेचे भीषण वास्तव नायकाने मांडले आहे.
शासनाची उच्चशिक्षण क्षेत्रातील सेट-नेट पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील तरूण अनेक वर्ष नोकरीची वाट पाहत आहेत. चतुर्थश्रेणीची रोजंदारीची नोकरी करायला देखील अनेक उच्चशिक्षित तरुण धडपडत आहेत. हे वास्तव आजच्या शिक्षणव्यवस्थेचे अपयश असून, मूल्यहृसाचे दुःख सोसणाऱ्या परंतु उमेद टिकवून ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणांची आर्त हाक नायकाने दिली आहे. ई-साधनांचा सुळसुळाट, त्याचा परिणाम हा नाटक, आकाशवाणी, वृत्तपत्र, चित्रपट आणि पुस्तक यासारख्या संवादी माध्यमांवर झालेला दिसून येतो. हजारो पुस्तके किंडल, फेसबुक, गुगलवर ई-बुकच्या माध्यमातून वाचता येतात. यातून वाचन संस्कृतीचा ऱ्हास होत आहे. व्हाट्सअप, फेसबुक, मेसेंजर सारख्या समाजमाध्यमांवर होणारी क्रीया- प्रतिक्रियांची स्पर्धा निरर्थक, चिंताजनक असून यामुळे शब्दाविना संवाद अशा या सांकेतिक संवादाने प्रत्यक्ष संवाद संपला आहे. म्हणून जीवन हे चैतन्यदायी, संवेदनशील करताना वाचनाचा अमृतानुभव हा पुस्तकाच्या स्पर्शातूनच घडतो हे आजच्या पिढीला पटवून देणे गरजेचे आहे.
बदलत्या काळातील शिक्षणाची माध्यम म्हणजे मोहाचे, रंजनाचे जाळे असून त्याला भेदण्यासाठी काही प्रयत्न, कृती, भूमिका, निर्णय होणं गरजेचं आहे असं नायकाला वाटतं. या माध्यमतंत्रामुळे माणसं व्यक्तिकेंद्रित झालीत. मानसिक- सामाजिक अंतर वाढले. विद्यार्थ्यांशी संवादी कसं राहायचं हा प्रश्न निर्माण झाला. म्हणून साहित्यातून देखील आजच्या तरुणांचे भावविश्व, प्रश्न आणि बदलांचा वेध घेणारे साहित्य निर्माण व्हावे. अन्यथा या माध्यम तंत्रज्ञानाच्या विळख्यात हरवलेल्या माध्यमकेंद्री माणसाचं जगणं आपला विवेक हरवतो की काय अशी भीती नायकाला वाटते.
कादंबरीतील काही पात्र ही खरोखरच गतिमान काळाच्या ओघात खूप काही सांगून जातात. नायकाच्या आयुष्यात सुमित्राचं येणं आणि अचानकपणे निघून जाणं हे खरतर वेदनादायी आहे. परंतु तिच्या अस्तित्वाची सावली नेहमी सोबत असल्याचं समाधान नायकाला वाटते. सुमित्राचं असं अवकाळी जाणं म्हणजे क्षणभंगुर जीवनाचं एक वास्तव आहे. एक सहकारी, मित्र म्हणून स्नेहाचं, जिव्हाळ्याचं काळजीचं असं हक्काचं नातं सुमित्राने नायकाशी जपलं. असं हे नातं एका ठराविक उंचीच्या पलीकडे जाऊन मनाच्या खोल कप्प्यात कायम जपलं जातं. असतं असं एखादं खास. हक्काचं. अरुण देखील असाच वैवाहिक सुखाच्या आशेने आयुष्य कंठीत जगणारा. लग्नाचं आमिष दाखवून अशाच एका टोळीने पैसे उकळून केलेली फसवणूक. लग्नसंबंधाच्या नावाखाली पवित्र नात्याच्या बाजारीकरणात अरुणसारख्या अनेकांची फसवणूक सुरू आहे, हे वास्तव खूप भयानक आहे.
तरी देखील जीवनाकडे निरंतर अपेक्षांनी पाहत भविष्यात कोणीतरी सहप्रवासी म्हणून येईल या भाबड्या आशेवर अरूणचा प्रवास सुरू आहे. विभा पाटणकर ही व्यक्तिरेखा म्हणजे नशीबी आलेलं शापित जगणं. नियती एका हाताने भरभरून देते आणि दुसऱ्या हाताने काढून घेते. जे सांधता आणि जोडताही येत नाही. त्याची किंमत भौतिक सुखात नसतेच. कवितेच्या दुनियेत स्वत्वाची तमा न बाळगता सर्वस्व पणाला लावून आलेलं रिक्तपण आणि दुर्दैवाने आलेलं एकाकी जगणं म्हणजे माणसाचं प्रारब्ध. प्रतारणेच्या वनव्यात स्वत्वाला जाळत पाटणकर यांचा दुर्दैवी अंत होताना भटांच्या कवितेचा तो स्वर आठवतो.. ‘मी बहर इथे शब्दांचे, नुसतेच उधळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते”… एकूणच या भौतिक बदलांच्या दिशेने जाताना भविष्यात ही कॉलेजेस, मोठमोठ्या इमारती, विद्यापीठे यांची गरज राहील का? असा प्रश्न नायकाला पडतो. स्मार्ट क्लासेस, शैक्षणिक धोरण, व्यावसायिक शिक्षण, स्वायत्तता, खाजगीकरण, दुरस्थ शिक्षण, ऑनलाईन अभ्यासक्रम अशा व्यावसायिक मूल्यांना प्राधान्य देणाऱ्या शिक्षण प्रणालीचा अवलंब करणारी शिक्षणव्यवस्था ही चिंताजनक आणि विशेषतः ग्रामीण व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणापुढील मोठी आव्हानं उभी करणारी आहेत. ही व्यवस्था आणि नव्या माध्यमांमुळे परिवर्तन हे एका नव्या तांत्रिक वळणावर येऊन ठेपले आहे, याचे उत्तर येणारा काळच देईल.
कोलाज ही कादंबरी प्रसंग, घटना आणि समाजवास्तवाचा कोलाहाल मांडताना लेखकाने बदलत्या काळाचा स्वर मांडला आहे. डॉ. अशोक लिंबेकरांनी प्रथमच कादंबरीच्या माध्यमातून स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी टाकलेलं हे पाऊल म्हणजे एका संवेदनशील लेखनाची ओळख आहे.
विजय पाटील, (9822020504)
संगमनेर महाविद्यालय, संगमनेर.
पुस्तकाचे नाव – कोलाज : संभ्रमांचे वर्तमान.
लेखक – डॉ. अशोक लिंबेकर
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर
किंमत : रुपये पाचशे

