महाराष्ट्र संवाद न्यूज
राज्य सरकारने नुकताच गेलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि पुरस्काराची रक्कम डॉ. दत्तात्रय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी सरकारला परत करणार आहेत. तसेच त्यांनी या पत्राद्वारे इथून पुढे भाजप आणि शिंदे गटाला मतदान न करण्याचे आवाहन श्री सेवकांना केले आहे. या अनुषंगाने धर्माधिकारी यांचे पत्र समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. मात्र हे पत्र बनावट असल्याचे धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणा दरम्यान श्री सदस्यांचा उष्माघाताने झालेल्या मृत्यूवरून राजकारण तापले असतानाच आता महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने शनिवारी समाज माध्यमांमध्ये एक पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. या पत्रात राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. समाज माध्यमात आलेल्या या पत्रामुळे खळबळ उडाली.
या संदर्भात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रवक्ते तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सचिव संदीप पाटील यांनी हे पत्र बनावट असल्याचे म्हटले आहे. कोणीतरी खोडसापणा करून यापूर्वी आप्पासाहेबांनी काढलेल्या पत्राचा वापर करून त्यातील मूळ मजकूर काढून त्यात फेरफार करत हे पत्र तयार केल्याचे म्हटले आहे. दरम्यान या संदर्भात पोलीस यंत्रणेने गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी म्हटले असल्याचे वृत्त लोकसत्ता ऑनलाईनने दिले आहे.

