निवडणूक विश्लेषण | अनंत पांगारकर
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपेक्षेप्रमाणे राज्याचे माजी मंत्री काँग्रेस नेते विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने सर्वच्या सर्व जागांवर यश मिळविले आहे. थोराताना शह देण्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाच्या नाकातोंडात पाणी गेले. थोरात यांच्या सैन्याने सेनापतीविना असलेल्या विखेंच्या सगळ्याच सोंगट्या मारल्या. शेतकरी मंडळाला एकही जागा मिळून न देणाऱ्या बुद्धिबळाच्या निवडणुकीत थोरात अखेर बाजीगर ठरले.
बिनविरोध निवडीची परंपरा मोडीत काढत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जनसेवा मंडळाचे उमेदवारी करत निवडणुकीत रंगत आणली होती. सर्वच्या सर्व 18 जागांवर विरोधकांनी उमेदवार दिले होते. उमेदवारांमध्ये प्रमुख नेत्यांचाच समावेश असल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने प्रतिष्ठेची होती. आगामी होऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या या नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार होती. मात्र पराभवामुळे त्यांचे महत्त्वच कमी करत त्यांचेही पक्षांतर्गत पंख छाटल्याचे बोलले जाते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांनी अचानकपणे विखे गटाकडून जनसेवा मंडळाची उमेदवारी केली. भाजप नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यासोबत असलेली आहेर यांची सलगी त्यांच्या पदावर गंडांतर आणणारी ठरली होती. जनसेवा मंडळाकडून उमेदवारी करताना त्यांनी जनसेवाच्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक 480 मत मिळविली. शिवसेना (ठाकरे) शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख माजी मंत्री बबन घोलप यांनी निवडणूक प्रचारादरम्यान आहेर यांच्यावर कारवाईचे संकेत दिले होते. त्यामुळे आहेर यांच्यावर पक्षांतर्गत कोणती कारवाई केली जाते हे देखील येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. शिवसेनेकडून आहेर यांनी यापूर्वी बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देखील केली आहे. त्यामुळे शिवसेनेतील ते वजनदार नेते म्हणून गणले जात होते. आहेर जिल्हा परिषदेचे संभाव्य उमेदवार असून ते कोणत्या पक्षाकडून लढणार याचे संकेत या निवडणुकीतून मिळाले आहे.
काही काळ राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे तालुकाप्रमुख असलेले डॉ. अशोक इथापे यांनी देखील जनसेवा मंडळाकडून बाजार समिती निवडणुकीत उमेदवारी केली. त्यांना 430 मते मिळाली. शेतकरी विकास मंडळाच्या सर्वाधिक कमी मतांनी विजयी झालेल्या उमेदवारात आणि त्यांच्यातील मतांचे अंतर 619 एवढे राहिले. त्यांच्याकडे देखील विधानसभेचे आणि जिल्हा परिषदेचे संभाव्य उमेदवार म्हणून बघितले जात होते. या पराभवामुळे त्यांच्याही अपेक्षांवर पाणी फ़ेरले जाण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाचे संगमनेर शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांना देखील जनसेवा मंडळाकडून उमेदवारी करावी लागली. त्यांना 409 मते मिळाली. संगमनेर पालिका निवडणुकीतील ते प्रमुख संभाव्य उमेदवार असून त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष पालिका निवडणुकीच्या मैदानात लढणार असल्याने त्यांचीदेखील या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. पराभवामुळे त्यांच्याही नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. हमाल मापारी मतदार संघात जनसेवाच्या सोमनाथ वर्पे यांना अवघे एक मत मिळाल्याने या एका मताबद्दल आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
याशिवाय भीमराज चत्तर, माजी तालुकाप्रमुख काशिनाथ पावसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शरद गोर्डे, संदीप घुगे, संदीप देशमुख यांनाही पराभव पदरी पडल्याने आगामी निवडणुकातील त्यांची संधी हुकण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्य राहिलेल्या रोहिणी निघुते यांना देखील पराभवास सामोरे जावे लागले. पराभूत झालेल्या उमेदवारांमधील बहुतेक जण मंत्री विखे यांच्या अतिशय निकटवर्तीय समजले जातात. एकूणच बाजार समितीची निवडणूक आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकीची दिशा ठरविणारी ठरली आहे.

