नारायणगाव (महाराष्ट्र संवाद न्यूज)
आंबेगाव तालुक्यात नासिक-पुणे महामार्गावर शेवळेवाडी परिसरात धावत्या एसटी बसचे मागचे दोन्ही चाके अचानक निखळली. दोन्ही चाक निखळल्यानंतर देखील काही वेळ बस महामार्गावर धावतच होती. मात्र चालकाच्या प्रसंगावधनांमुळे मोठा अपघात टळला. बसमधील सर्व ३५ प्रवासी या अपघातातून सुखरूप बचावले आहे.
सामान्य प्रवाशांची लालपरी असलेल्या बसचा हा अपघात भीषण होता. महामार्गावरून धावत असलेल्या बसचे दोन्ही चाके अचानकपणे निखळल्यानंतर देखील बस तिरपी होऊन पुढील दोन चाकांवर काही वेळ महामार्गावर धावत होती. धावणाऱ्या बसचे एक चाक रस्त्याच्या बाजूला खोल ओढ्यामध्ये तर एक चाक बसच्या पुढे जाऊन पडले.
अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण होऊन बसमधील प्रवाशांच्या उरात धडकी भरली होती. बसमधील प्रवाशांनी यावेळी एकच गलका केला होता.
परेल डेपोची बस असून ती नारायणगावकडे येत होती. आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी हद्दीत मोरडे चॉकलेट कारखान्याजवळ ही दुर्घटना घडली.

