संगमनेर: अनंत पांगारकर
(महाराष्ट्र संवाद न्यूज)
सूर्य डोक्यावर आग ओकत असताना निळवंडेचे पाणी देखील तापले आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहिले असून यात पंतप्रधानांची वेळ मिळाल्यावर सवडीने निळवंडे धरण व कालव्याचे उद्घाटन करा, आधी कालव्यांद्वारे दुष्काळी भागातील जनतेला पाणी द्या. अशी मागणी केली आहे.
थोरात यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दहा टीएमसी पाण्याची उपलब्धता असताना, दुष्काळी भागाला हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवू नका, जनतेच्या मनात सरकार बद्दल प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. जनतेच्या उद्रेकाची वाट पाहू नका. त्यांना त्यांच्या हक्काचे पाणी देण्याचे पुण्यकर्म सरकारने पार पाडावे.
विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निळवंडे च्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागितलेली आहे मात्र ती मिळत नसताना धरणात असलेला पाणीसाठा लाभार्थ्यांना अद्यापही मिळू शकलेला नाही या पार्श्वभूमीवर थोरात यांनी घेतलेली स्पष्ट भूमिका चांगलीच चर्चेत आली आहे. थोरात यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना लिहिलेले पत्र समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या वाचकांसाठी थोरात यांनी लिहिलेले पत्र जसेच्या तसे देत आहोत.
माननीय महोदय,
अत्यंत तातडीच्या विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. दुष्काळी भागाला नजरेसमोर ठेवून निळवंडे धरण आणि कालव्यांचे काम करण्यात आलेले आहे. सध्या निळवंडे व भंडारदरा धरणातून किमान दहा टीएमसी पाणी आपण दुष्काळी भागाला देऊ शकतो, मात्र केवळ आदरणीय पंतप्रधान महोदयांची उद्घाटनासाठी वेळ मिळत नाही म्हणून या हक्काच्या पाण्यापासून दुष्काळी भागातील जनता वंचित राहिलेली आहे.
निळवंडे धरण आणि डाव्या कालव्याचे काम यापूर्वीच पूर्ण झालेले आहे. आपले सरकार आल्यानंतर उजव्या कालव्याचे काम रखडलेले आहे. त्याला अपेक्षित गती मिळताना दिसत नाही. उन्हाळा सुरू झालेला आहे. शिवाय मान्सूनला आता अल निनोचा धोका आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. सरकारलाही या भविष्यकालीन दुष्काळाची तीव्रता माहित आहे. त्यामुळे दुष्काळी भागाचे हक्काचे दहा टीएमसी पाणी लाभक्षेत्रातील बांधवांना मिळणे अत्यावश्यक आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर या पाण्याचा दुष्काळी भागातील शेतकरी बांधवांना उपयोग होणार नाही. आपण तातडीने दुष्काळी भागाला पाणी द्यावे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना माहीत आहे. धरणांमध्ये पाणी असतानाही लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही, त्यामुळे जनतेच्या मनात सरकार बद्दल प्रचंड रोष आहे. जनतेच्या मनातली ही भावना आपण समजून घ्यावी. हवेतर नंतर सवडीनुसार आदरणीय पंतप्रधानांना बोलवावे, उद्घाटनाचा मोठा कार्यक्रम करावा त्याला आमची अजिबात हरकत नाही. मात्र हक्काचे दहा टीएमसी पाणी हे त्वरित दुष्काळी भागातील जनतेला देण्याचे पुण्यकर्म आपण करावे, अशी आपणास विनंती करतो.
आपला
(बाळासाहेब थोरात)

