महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर: शहरातील नासिक-पुणे महामार्गावर असलेल्या जोर्वे नाका येथे रविवारी रात्री झालेल्या हाणामारी आणि दंगल प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या वीसवर गेली आहे. यातील सोळा आरोपींना मंगळवारी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर उर्वरित आरोपींना न्यायालयाने बुधवारी पाच जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
रविवारी रात्री जोर्वे नाका येथे झालेल्या वादातून काही नागरिकांवर प्राणघात हल्ल्याचा प्रयत्न झाला. धारदार शस्त्राचा वापर करत दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला. गुन्हेगारांनी थेट कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देत अशांतता निर्माण केल्याने पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. यामुळे शहरातील व परिसरातील ग्रामीण भागातील गावांमध्ये तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलीस यंत्रणेने वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
या प्रकाराची राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय पातळीवरून देखील गंभीर दखल घेण्यात आली. त्यामुळे संगमनेरमध्ये नासिक परिक्षेत्राचे आयजी बी. जी. शेखर, अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संगमनेरमध्ये ठाण मांडले होते. राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक शहरात पाचरण करण्यात आले.
याशिवाय अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे निरीक्षक भगवान मथुरे यांनी शहराच्या वादग्रस्त भागात धडक कारवाई करत सुरुवातीला सोळा आणि मंगळवारी रात्री आणखी चौघा आरोपींना पकडले. तसेच नगरपरिषदेच्या मदतीने वादाला कारणीभूत ठरलेले अतिक्रमण देखील हटवून हा संपूर्ण परिसर अतिक्रमण मुक्त केल्याने पोलीस कारवाईचे स्वागत होत आहे.
पोलिसांनी आत्तापर्यंत अटक केलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे…
नईम कादर शेख, रेहान गुलफान पठाण, शेहबाज याकूब शेख, मोबीन मुबारक शेख, नफीस अनिस पठाण, अमीर रफिक शेख, इम्रान उस्मान पठाण, तौफिक शफिक शेख इस्माईल निसार पठाण, अबुजर बिलाल शेख, अलताफ मुस्तफा अन्सारी, सलमान साजिद शेख, अमजद गुलामनबी शेख, शकील नासीर पठाण, शेहबाज गफार शेख व अहद सय्यद आद अन्सार यांना मंगळवारी अटक करण्यात आली. सरकारी वकील मिराज पर्बत यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना 2 जुनपर्यंत तर बुधवारी रात्री अरबाज करीम शेख, कासिफ असद कुरेशी, हजेब शब्बीर शेख व फैसल महमद शेख या चौघांना अटक केली असून बुधवारी त्यांना न्यायालयासमोर नेण्यात आले. न्यायालयाने त्यांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

