महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – संगमनेर शहरातील जोर्वे नाका येथे घडलेल्या घटनेनंतर संगमनेर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सतर्कता दाखवत पोलीस यंत्रणेने परिस्थितीवर नियंत्रण मिळविले असले तरी या घटनेचे पडसाद समाज माध्यमांवर उमटू लागले आहे. या पार्श्वभूमीवर सायबर पोलीस सतर्क झाले असून समाज माध्यमांवरील मेसेज मुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ‘ॲडमिन’वर पोलीस कारवाई करण्याचा इशारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिला आहे.
पोलीस निरीक्षक मथुरे यांनी या संदर्भात केलेले आवाहन देखील पोलीस खात्याकडून विविध व्हाट्सअप ग्रुप, समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आले आहे. समाज माध्यमांवर विविध टीका टिप्पणी करणारे तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे संगमनेर पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मथुरे, आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी या संदर्भात समाज माध्यमांवरील या मेसेजची दखल घेत कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने दोन समाजात तेढ निर्माण होईल असे मेसेज टाकणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांचे काय आहे आवाहन
???? महत्वाची सूचना????
सायबर पोलीस ठाणे सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
आपण सर्व संगमनेर शहरातील सुज्ञ नागरिक आहात संगमनेर शहरातील जातीय सलोखा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी हे आपले ही कर्तव्य आहे.
असे असतांना सोशल मीडिया, मोबाईल फोनवरील व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वैगरे माध्यमाद्वारे आपले काही समाज बांधव हेतू पुरस्कार दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल असे भडकावू विधाने चित्रफिती व इतर प्रसारित करीत असल्याचे दिसून येत आहे.
आपल्या अशा कृत्यामुळे संगमनेर शहर अथवा परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आपणास व आपल्या सहकाऱ्यांना सर्वस्वी जबाबदार धरून आपल्या व ग्रुपच्या एडमिन विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
भगवान मथुरे, पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर पोलीस स्टेशन.


