महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – बेलगाम सुरू असलेली प्रवरा नदी पात्रातील वाळू तस्करी पुन्हा एकदा जीवावर बेतली आहे. प्रवरा नदीपात्रात सोमवारी तीन विद्यार्थी बुडाले. पाण्यात बुडालेल्या तिघांपैकी एकाला वाचविण्यात यश आले तर उर्वरित दोघांचे मृतदेह शोध मोहिमेनंतर नदीपात्रात आढळून आले.
सोमवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला. सुदैवाने आसपास असलेल्या नागरिकांमुळे यातील एकाला वाचविण्यात यश आले. उर्वरित दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. दोघांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. निलेश माधव अस्वले (वय 18 वर्ष, रा. नवलेवाडी, अकोले जि. अहमदनगर) व अमोल उत्तम घाणे (वय 18 वर्षे, रा. धुमाळवाडी, ता. अकोले, जि. अहमदनगर) अशी मृत झालेल्या दोघा विद्यार्थी मित्रांची नावे आहे.
नदीपात्रात वाळू तस्करांनी केलेल्या वाळूच्या बेलगाम उपशामुळे प्रचंड खड्डे पडलेले आहे. नगरपरिषदेने देखील या ठिकाणी फलक लावले असून नदीपात्रात उतरण्यास मज्जाव केला आहे. तरी देखील लोक या सूचनेकडे दुर्लक्ष करत नदीपात्रात उतरत असतात. खड्ड्यांमुळे पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही.
सोमवारी दुपारी निलेश अस्वले, अमोल घाणे व युवराज धुमाळ हे तिघेजण महाविद्यालयीन कामासाठी संगमनेरला आले होते. त्यानंतर हे तिघे घुलेवाडीतील ऋतुराज थोरात व हर्षल भुतांबरे या दोघा मित्रांसह दुपारी प्रवरा नदीवर पोहण्यासाठी आले होते. ते सर्वजण नदीपात्रात उतरल्यानंतर त्यातील निलेश अस्वले व अमोल घाणे हे दोघेही पोहत दूरवर गेले. नदीपात्रातील वाळू तस्करांनी केलेल्या खड्ड्यात ते मधल्या धारेपर्यंत गेल्याने प्रवाहाने क्षणात त्यांना आपल्या कह्यात ओढले. नाका-तोंडात पाणी गेल्याने ते ओरडू लागले. युवराज धुमाळ याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.
प्रवरा नदीपात्रात दोघेजण वाहून गेल्याचे वृत्त शहरात पसरतात नागरिकांनी प्रवरा नदीवर धाव घेतली. होणाऱ्या नागरिकांनी नदीपात्रात त्यांचा शोध घेतला असता बऱ्याच वेळानंतर दोघांचे मृतदेह हाती लागले. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात वाळू तस्कर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

