महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – पिकअप चालकाला चौघांनी मारहाण करत पिकअपसह सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्याची घटना नाशिक पुणे महामार्गावरील गुंजाळवाडी शिवारात घडली. दरम्यान काही वेळानंतर पोलीस पथकासह पिकअपचा शोध घेतला असता ती बेवारस स्थितीमध्ये जवळच कासारवाडी मध्ये आढळून आल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्री चोरीची ही घटना घडली. अधिक माहिती अशी, महेश रतीलाल पंचाळ हा वाहन चालक पिकअप घेऊन गुजरातहून नासिक-पुणे मार्गाने कर्नाटकला जात असताना सोमवारी रात्री सव्वा बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान पिकअप घेऊन गुंजाळवाडी शिवारातून उड्डाणपूल पास करून जात असताना लघुशंकेसाठी थांबला होता. याच दरम्यान तेथे आलेल्या चौघांनी त्याला लाथाबूक्क्याने मारहाण करत त्याच्या खिशातील मोबाईल फोन, अडीच हजार रुपयांची रोख रक्कम व वाहनाचे कागदपत्र काढून घेत मशिनरी पार्टने भरलेली पिकअप (क्र. GJ 06 BT 2892) पुण्याच्या दिशेने पळवून नेली.
रस्त्याने जाणाऱ्या बाळासाहेब कानवडे यांनी वाहन चालकाच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर चौकशी केली असता वाहन चालक पंचाळ याने घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यामुळे कानवडे यांनी वाहनचालकाला घेऊन संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घडलेल्या घटनेची माहिती घेत लगेचच रात्रपाळीच्या गस्तीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार आणि पोलीस पथकाने वाहनचालकाला सोबत घेत घटनास्थळ गाठले.
पथकाने चोरट्यांचा आणि पिकअपचा शोध सुरू केला असता घटनास्थळापासून काही अंतरावर कासारवाडी गावच्या शिवारामध्ये पथकाला चोरीस गेलेली पिकअप बेवारस स्थितीमध्ये आढळून आली. पोलीस पथकाच्या सतर्कतेमुळे चोरीस गेलेली पिकअप आणि तिच्यात असलेले सुमारे दोन लाख रुपये किमतीची मशीनरी आणि वाहनाचे कागदपत्र आढळून आले. मात्र चोरट्याने पंचाळ यांच्याकडील अडीच हजाराची रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन पोबारा केला आहे. पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

