महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – निर्ढावलेल्या दागिने चोरांनी पोलीस यंत्रणेला पोलीस यंत्रणेला आव्हान देतानाच सोमवारी दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पावणेतीन लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना शहरातील अकोले नाका परिसरात घडली.
संगमनेरमध्ये दागिने आणि दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. उपविभागाचा पदभार घेतलेल्या उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासमोर या गुन्हेगारीचा बीमोड करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. शहर पोलीस ठाण्यात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेले कर्मचारी देखील चोरांचा अद्याप शोध लावू शकलेले नाही. त्यामुळे या पोलीस ठाण्यात निश्चितच पाणी कुठेतरी मुरतंय असे दिसते. या दोन्ही अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्याचा विशेषतः कर्मचाऱ्यांचा बारकाईने अभ्यास करून आपली भूमिका ठरवावी लागणार असल्याचे बोलले जाते.
रविवारी रात्री महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास करून सोळा तास उलटत नाही तोच दागिने चोरीची दुसरी घटना समोर आली आहे. सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास धुमाळवाडी (अकोले) येथील सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मण पंढरीनाथ धुमाळ (वय 69 वर्ष) हे आपल्या इलेक्ट्रिक दुचाकीवरून नातू भावेश धुमाळ यांच्यासह तळेगाव दिघे (संगमनेर) येथे आपल्या नातीला भेटण्यासाठी चालले होते. ते अकोले नाका परिसरातील महासागर बार समोर आले असता त्याच वेळी समोरून एका काळ्या रंगाच्या पल्सर वरून आलेल्या दोघा जणांनी त्यांच्या दुचाकीसमोर दुचाकी उभी करत त्यांना थांबण्यास सांगितले.
दुचाकीवरील या दोघांपैकी एकाने त्यांना पोलीस असल्याचे कार्ड दाखवत, पुढे शिंदे साहेब उभे आहेत, तुम्ही अंगावर एवढे सोने घालून जाऊ नका नाहीतर साहेब आम्हाला खूप बोलतील असे सांगत एक कागद काढला व धुमाळ यांना अंगावरील सर्व दागिने काढून त्यात ठेवण्यास सांगितले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे धुमाळ यांनी गळ्यातील सोन्याची चैन, हातातील सोन्याच्या चार अंगठ्या व एक चांदीची अंगठी काढून त्या कागदात ठेवली. त्यानंतर त्याने त्या कागदाची पुढील करत ती पुडी धुमाळ यांच्या हातात न देता त्यांना गाडीची डिक्की उघडण्यास सांगितले.
धुमाळ यांनी गाडीची डिक्की उघडली असता त्याने ती पुढे डिक्कीमध्ये ठेवली. आणि तेथून भरधाव वेगाने अकोले रोडच्या दिशेने निघून गेले. त्यामुळे धुमाळ यांना संशय आल्याने त्यांनी पुन्हा डिक्की उघडत पुढे काढून बघितले असता त्यामध्ये वाळू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यामुळे धुमाळ यांनी थेट शहर पोलीस ठाण्यात येऊन पोलीस असल्याची बतावणी करत दोघाजणांनी आपल्याकडील 2 लाख 10 हजार रुपये किमतीचे 70 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, प्रत्येकी 15 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या 5 ग्रॅमच्या दोन अंगठ्या, बावीस हजार पाचशे रुपये किमतीची सोन्याची साडेसात ग्रॅमची अंगठी व दीड हजार रुपये किमतीची चांदीची अंगठी असे एकूण 2 लाख 64 हजार रुपयांचे दागिने हात चलाखीने लंपास केल्याचे फिर्याद दिली.
धुमाळ यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 420 170 34 नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

