महाराष्ट्र संवाद न्यूज
पबजी खेळाच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी झालेल्या ओळखीतून संगमनेर शहरालगतच्या कासारवाडी शिवारात तरुणी व नागरिकांच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न असल्याचे घटना समोर आले आहे. शहर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून पोलिसांनी पकडलेले दोन्ही आरोपी बिहार राज्यातील आहेत. या घटनेमागे सध्या सुरू असलेल्या लव्ह जिहाद सारखा प्रकार आहे का या दृष्टीनेही संगमनेर पोलीस तपास करत आहे.
अकरम शहाबुद्दीन शेख व मोहम्मद नेमतुल्ला मोहम्मद कैसर (दोघे रा. अलीनगर, जि. दरभंगा, बिहार) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना शनिवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
संगमनेर विभागाचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे व शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या व बी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीची पब्जी गेम खेळत असताना दोन वर्षांपूर्वी अकरम शहाबुद्दीन शेख याच्यासोबत ओळख झाली होती. तेव्हापासून पीडित तरुणी आणि आरोपी यांच्यामध्ये पबजी, व्हाट्सअपच्या माध्यमातून सातत्याने गप्पा होत असत.
या ओळखीतूनच रविवारी (ता. 11) मोबाईल फोनवर दोघांमध्ये झालेल्या संभाषणातून संगमनेर येथे एकमेकांना भेटण्याचे ठरले होते. त्यानंतर आरोपी अकरम शेख हा त्याचा मित्र मोहम्मद नेमतुल्ला मोहम्मद कैसर याच्यासह शुक्रवारी (ता.१६) संगमनेरमध्ये या तरुणीला भेटण्यासाठी आला होता. बस स्थानकावर आल्यानंतर त्याने या तरुणीला फोन करून आपण आल्याची कल्पना दिली. व तिला भेटण्यासाठी कासारवाडी भागातील मालपाणी रिसॉर्टमध्ये आरोपी थांबला होता. तेथे त्याने पीडित तरुणीला भेटायला बोलावले होते.
सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी अकरम शेख याला भेटण्यासाठी गेले असता त्याने येथे बरेच लोक आहेत आपण थोडे लांब निवांत जाऊन बोलू असे तिला सांगितले. तेथून दोन्ही आरोपी व पीडित तरुणी कासारा दुमाला रोडकडे जात असताना अचानक जवळ आलेल्या अकरम शेख याने तिला “तू माझ्यासोबत माझ्या गावाकडे बिहारला चल तू मला खूप आवडतेस आपण दोघे लग्न करू”असे म्हणाला.
त्यावेळी पीडित तरुणीने त्याला मी मित्र या नात्याने भेटायला आले आहे. मी तुझ्यासोबत येणार नाही, असे म्हणत त्याच्यासोबत बिहारला जाण्यास नकार दिल्याने दोघाजणांनी बळजबरीने तिचा हात पकडून “तुला आमच्या सोबत यावे लागेल नाहीतर तुझ्या घरी येऊन तुझी बदनामी करू अशी धमकी दिली”. तशातच तिला तीस-पस्तीस फुटापर्यंत ओढत नेले. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने आरडाओरडा केला.
तरुणीचा आरडाओरडा ऐकून जवळचे काही लोक तेथे जमा झाले. त्यांनी या मुलीची विचारपूस केले असता तिने घडलेल्या प्रकार त्यांना सांगितला. त्यामुळे मदतीसाठी आलेल्या लोकांनी या दोघांनाही पकडून ठेवत शहर पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले.
तरुणीच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 354(अ), 366, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेने शहरात लव्ह जिहादची चर्चा सुरू होती.
या पार्श्वभूमीवर पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे व निरीक्षक भगवान मथुरे यांनी सांगितले की, सदर गुन्ह्यामध्ये सायबर पोलिसांची मदत घेतली जात असून त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर आणखी स्पष्टता होणार आहे. दरम्यान अटक करण्यात आलेले आरोपी बिहार राज्यातून संगमनेर शहरात कोणाच्या मदतीने, कसे आले, नेमके कोणत्या कारणाकरता आले, त्यांचा येथे येण्यामागचा हेतू काय होता, त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का या सर्व दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगितले.

