महाराष्ट्र संवाद न्यूज
एकीकडे समृद्धी महामार्गावर झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या झालेल्या भीषण अपघातातील मृतदेहांची ओळख न पटल्याने सामूहिक अंत्यसंस्काराचा कार्यक्रम सुरू होता तर दुसरीकडे राजभवनात शपथविधीचे नाट्य सुरू होते. महाराष्ट्र अपघाताच्या घटनेने हळहळत असताना राज्याच्या राजकारणात सत्तेच्या सारीपाटाचा आनंदी सोहळा रंगला होता. या पार्श्वभूमीवर अकोला येथील ॲड. अनंत खेळकर यांची यावर भाष्य करणारी कविता समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या वाचकांसाठी सोशल मीडियाच्या सौजन्याने आम्ही ती आपणासाठी देत आहोत.
——————–
तिकडे समृध्दी महामार्गावर
झाले देहाचे कोळसे
ईकडे मात्र राजकारण
घेत होते ‘वळसे’
ओळख पटली नाही
म्हणून सामुहिक अंत्यविधी
तिकडे त्यांची चिता जळाली
ईकडे ह्यांचा ‘शपथविधी’
मृतकांचे हाल बघुन
पाझर काळजाला फुटेल
अशावेळी ‘प्रफुल्ल’ चेहरा
सांगा कुणाला ‘पटेल’ ?
‘पुतण्या’च्या मुतण्यावर
किती चढला होता पारा ?
‘घड्याळ’ म्हणालं काट्यांना
वाजवले माणुसकीचे बारा
‘भूज-बळ’ वाढताच
‘कमळा’बाईवर हा असर पडला
टाहो फोडणाऱ्यांच्या सांत्वनाचाही विसर पडला
आज ‘शरदा’चे चांदणे
ऊद्या ‘मून -डे’ होईल
‘पाच लाख‘ दिल्याने
जिव कसा परत येईल ?
‘नमो नमो’च्या मंत्रासंगे
ते फेकतात ‘ईडी’ लिंबू
गट ‘तट-करे’ल त्याला
तिकडे भेटतो तंबु
मृतदेहाचे सरण पेटताच
गहीवरून आले मन
पण पुढाऱ्यांनी साजरा केला
‘शपथविधी’चा ‘हा-सण’
घाला घातला काळाने
मृत्यूने साधला डाव
अशा वेळी तुमचा ‘धर्म’
सांगा कुठे गेला ‘राव’ ?
काय करावे सुचत नाही
आमचे गाऱ्हाणे ‘एैक-नाथा‘
‘धनुष्या’तील ‘बाण’
कुणावर चालतील आता
सोहळ्यामुळे श्रध्दांजलीसाठी
नव्हती कुणाला ऊसंत
स्वप्नातही वाटलं नाही
ते दाखवताय तुम्ही ‘पंत’
—————-

