आजच्या बदलत्या काळात तत्त्व जिवंत ठेवण्याचा संघर्ष : कुलगुरू संजीव सोनवणे
चिन्नण्णाच्या माध्यमातून एक चांगले पुस्तक महाराष्ट्रासमोर: आमदार बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची प्रगल्भता आणि राजकीय क्षमता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात आहे. सध्याच्या परिस्थितीत चांगले दिवस आले असल्याने बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ विचारवंत लेखक डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केली.
जयहिंद लोक चळवळ आयोजित चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या हिरालाल पगडाल लिखित ‘चिन्नण्णा’ या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी आमदार जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक डॉ. सुधीर तांबे होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते, पुस्तकाचे प्रकाशक घनश्याम पाटील, साहित्यिक डॉ. संतोष खेडलेकर, शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक लेखक संदीप वाकचौरे यांच्यासह ‘चिन्नण्णा’चे लेखक हिरालाल पगडाल व्यासपीठावर उपस्थित होते.
कसबे म्हणाले, आजच्या परिस्थितीत कुलगुरू संजय सोनवणे व माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांचेही आत्मचरित्र यायला हवे अशी अपेक्षा व्यक्त करत पगडाल यांना आपण विद्यार्थी दशेपासून ओळखतो. वाद विवाद स्पर्धांच्या माध्यमातून ते पुढे आले आहे. चिन्नण्णामध्ये सामान्य कुटुंबातून आलेल्या त्यांच्या अनुभवाचा संघर्ष दिसतो. त्यांनी जे अनुभवलं भोगले सोसलं त्या सगळ्यांचा या पुस्तकात समावेश आहे हे पुस्तक सामाजिक शास्त्राचा दस्ताऐवज असून या दृष्टीने आत्मचरित्राला महत्त्वाचे स्थान आहे.
स्वतः काहीतरी सोसल्याशिवाय समाजाला काही सांगता येत नाही. मार्क्सवाद, समाजवाद, फुले, शाहू, आंबेडकरवाद असून देखील या सर्व गोष्टीकडे बघण्यासाठी तुम्हाला स्वतःची दृष्टी असावी लागते. त्यासाठी समाजात सतत रिलेटेड राहावं लागतं. इतिहास राजे-रजवाडे घडवत नाही तर तो सामान्य माणूस घडवत असतात असे कसबे यांनी म्हटले.
सोनवणे म्हणाले, आजच्या बदलत्या काळामध्ये आपले तत्व कसं जिवंत ठेवायचं हा मोठा स्वतःशी स्वतःचा असणारा संघर्ष आहे. अशा परिस्थितीत स्वतःच्या तत्त्वासाठी पुढे-पुढे जाण्याची आवश्यकता आहे. पगडाल छोटे असले तरी त्यांच्या रूपाने चिन्नण्णाचे कर्तृत्व मोठे आहे. सामान्य माणसाच्या धडपडीचे विचाराचे भाव चिन्नण्णामध्ये दिसतात. पगडाल यांच्यासारखे अनेक छोटे छोटे काजवे एकत्र येण्याची व उजेड पाडण्याची आवश्यकता आहे.
थोरात म्हणाले, चिन्नण्णा या पुस्तकाच्या माध्यमातून एक चांगले पुस्तक महाराष्ट्र समोर येत आहे. याशिवाय हे पुस्तक ऑडिओ बुकमध्ये उपलब्ध असून परदेशातील मराठी भाषिक मुलांनी त्याचे केलेले वाचन एक अभिनव उपक्रम ठरला आहे. पगडाल यांच्या ‘चिन्नण्णा’ या पुस्तकाच्या माध्यमातून संगमनेरमधील अनेक गोष्टींचा जसा इतिहास उलगडत जातो तसाच पगडाल यांचा संघर्ष देखील समोर येतो. पगडाल यांचा स्वभाव सत्याच्या जवळ जाण्याचे प्रयत्न करणारे एक आगळे वेगळे सॉफ्टवेअर असल्याचे पुस्तकातून दिसून येते. सुरुवातीच्या पहिल्या आपल्या अपक्ष उमेदवारीला दोन माणसांनी विरोध केला होता भाऊसाहेब थोरात यांच्यासह दुसरे पगडाल सर होते.
या पुस्तकाच्या माध्यमातून संगमनेरची राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक वाटचाल समोर येते. पगडाल एक सिद्धहस्त लेखक आहे. सध्या राष्ट्रसेवा दलाच्या विचाराला ताकद देण्याची गरज निर्माण झाली आहे. राष्ट्रसेवा दल, साधना, साने गुरुजींच्या तत्त्वज्ञानासाठी, लिखाणासाठी पगडाल यांनी जीवनाचे उद्दिष्ट निश्चित करावे अशी अपेक्षा थोरात यांनी व्यक्त केली.
यावेळी माजी आमदार डॉ. तांबे, डॉ. संजय मालपाणी, माजी नगराध्यक्ष तांबे, उत्कर्षा रूपवते, घनश्याम पाटील यांची भाषणे झाली. सुनिता पगडाल यांनी प्रास्ताविक केले तर संदीप वाकचौरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संगमनेरमधील विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.

