महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर – जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करत मोर्चा काढल्या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी एकवीस प्रमुख पदाधिकाऱ्यांसह इतर सव्वाशे आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुमारे दीडशे लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने मोर्चेकर्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
राज्यात मागासवर्गीय समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत नांदेड येथील मागासवर्गीय तरुण अक्षय भालेराव याची निर्घून हत्या, मुंबई येथे इंजीनियरिंगचे शिक्षण घेणारी युवती हिना मेश्राम हिच्यावर अत्याचार करून तिच्या झालेल्या हत्याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, या दोघांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी यासह अन्य मागण्यासाठी शनिवारी (8 जुलै) विविध संघटनांच्यावतीने निषेधाच्या घोषणा देत प्रांताधिकारी कार्यालयावर निळा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.
या संदर्भात रविवारी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांनी फिर्याद दिली आहे. जिल्हाधिकारी यांनी एका आदेशाद्वारे जिल्ह्याच्या स्थळ सीमेमध्ये चार जुलै ते 17 जुलै दरम्यान महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते. मोर्चेकर्यांनी या आदेशाचा भंग केल्याच्या कारणावरून शहर पोलीस ठाण्यात सुमारे दीडशे आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये किशोर सुदामराव चव्हाण (रा. दिल्ली नाका, संगमनेर), आशिष प्रभाकर शेळके (रा. उंबरी बाळापुर, ता. संगमनेर), ॲड. किरण सुधाकर रोहम (रा. पिंपरणे, ता. संगमनेर), प्रवीण देवेंद्र गायकवाड (रा. समनापुर, ता. संगमनेर), राजू यादव खरात (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), बाळासाहेब गोपीनाथ गायकवाड (रा. वडगाव पान, ता. संगमनेर), शशिकांत विनायक दारोळे (रा. ढोलवाडी, बुद्धविहार, संगमनेर), संदीप भाऊ मोकळ (रा. पारेगाव, ता. संगमनेर), रामदास दादू दारोळे (रा. राजवाडा, पुणे रोड, संगमनेर), कैलास राजाराम कासार (रा. देवाचा मळा, संगमनेर), रवी अरुण गिरी (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), पप्पू आकाश अर्जुन गोडगे (रा. इंदिरानगर, संगमनेर), माणिक दाजीबा यादव (रा. जोर्वे, ता. संगमनेर), रामदास सुरळकर (रा. राजापूर, संगमनेर), दीपक रणशेवरे (रा. संगमनेर), संध्या खरे (रा. अकोले नाका, संगमनेर), विजय वाकचौरे (रा. अकोले), मंजाबापू साळवे (रा. जाखुरी ता. संगमनेर), वंचित आघाडीचे अजीज ओहरा (रा. संगमनेर), सुनील रमेश रुपवते (रा. माधव थिएटर जवळ, संगमनेर), किशोर दादू वाघमारे (रा. संगमनेर) या प्रमुख मोर्चेकर्यांसह सुमारे शंभर ते सव्वाशे जणांचा समावेश आहे.

