महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर – सध्या सत्तारुढ असलेल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या काळात राज्याची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. लोकशाहीत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन, मोर्चे काढले जातात. मात्र सध्या कायद्याचा गैरवापर करत आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे सत्र या सरकारकडून सुरू असल्याचा आरोप करीत दलित बांधवांनी शनिवारी काढलेल्या मोर्चा प्रकरणी सुमारे दीडशे जणांवर पोलिसांच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्यात आला याचा शिवसेनेचे (ठाकरे) शहरप्रमुख अमरभाऊ कतारी यांनी निषेध केला आहे.
कतारी यांनी म्हटले आहे की, नांदेड येथील अक्षय भालेराव आणि मुंबई येथील हिना मेश्राम यांच्या हत्येच्या निषेधार्थ दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी शहर व तालुक्यातील दलित संघटनांच्या वतीने शनिवारी (8 जुलै) निळ्या मोर्चाचं संगमनेरमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. मोर्चामध्ये दलित बांधवांनी एकत्रित येत निळे वादळ तयार केले होते.
दलित समाजातील नेते कार्यकर्त्यांनी अतिशय शांततेत सदरचा मोर्चा काढला होता शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून मोर्चाची सांगता झाली या गोष्टीचा काही राजकीय लोकांना राग आला व त्यांनी सत्तेचा पोलीस बाळाचा गैरवापर करत सुमारे दीडशे दलित बांधव व नेत्यांवर मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1), 37 (3) कलम 135 नुसार गुन्हे दाखल केले. या प्रकाराचा कतारी व शिवसेना तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी निषेध व्यक्त करत दलित समाजाच्या पाठीशी आपण उभे असल्याचे कतारी यांनी म्हटले आहे.
याच पद्धतीने संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाच्यावतीने काढलेल्या भगवा मोर्चा प्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा राजकीय हेतू पुरस्कार सूडबुद्धीने दाखल करण्यात आल्याचा आरोप करत काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये शिवसेनेच्या (शिंदे गटाच्या) सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता विद्यमान खासदार संजय राऊत यांच्या छायाचित्राला काळे फासत आंदोलन केले होते. या संदर्भात शिवसेनेने (ठाकरे) आक्षेप घेत आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करून देखील अद्यापही आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले नाही.
त्यामुळे भाजप सरकारच्या काळात एकाला एक न्याय व दुसऱ्याला दुसरा न्याय हे धोरण चुकीचे आहे. पोलीस दलाने देखील अशा पद्धतीचा दुजाभाव करणे योग्य नाही. या प्रकाराचा निषेध करत शिवसेना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या) कार्यकर्त्यांवर त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी करत स्थानिक पोलीस यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या हातातील कठपुतली नसल्याचे दाखवून द्यावे, असे देखील कतारी यांनी म्हटले आहे.

