महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात विविध भागातील डोंगर, टेकड्या, माळरान हरित झाली आहेत. अभियाना अंतर्गत आतापर्यंत 80 लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले असून यावर्षी ही संख्या एक कोटीवर नेण्याचा संकल्प असल्याची माहिती दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्प प्रमुख संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष तांबे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना यावेळी रोपण करण्यासाठी रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिवाजीराव खुळे, विठ्ठलबाबा खुळे, सहकार महर्षी थोरात कारखान्याचे संचालक डॉ. तुषार दिघे, प्राचार्य श्रीकांत माघाडे, प्रकल्प प्रमुख शंकर शिंदे, प्राध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
तांबे म्हणाल्या, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर तालुक्यात दंडकारण्य अभियानाची लोक चळवळ उभे राहिली आहे. वयाच्या 83 व्या वर्षी सहकार महर्षी थोरात यांनी “झाडे लावणारा माणूस” हे पुस्तक वाचले आणि यातून प्रेरणा घेत आपणही झाडे लावली पाहिजेत ही कल्पना त्यांनी सोबतच्या सर्वांना सांगितली आणि तालुक्यात झाडे लावण्यासाठी ते झपाटून कामाला लागले. यातूनच दंडकारण्य अभियानाचा जन्म झाला. या अभियानाचे रूपांतर पुढे लोक चळवळीत झाले आहे.
आपल्या आयुष्यातील वृक्षांचे महत्त्व प्रत्येक भारतीय नागरिकाने समजावून घेण्याची आवश्यकता आहे. जीवन जगण्यासाठी वृक्ष आपल्याला सर्व काही देतात. वृक्ष आहेत म्हणून माणसे, पशु-पक्षी सुरक्षित आहे. त्यामुळे वृक्षांवर प्रेम करताना, झाडे लावा झाडे जगवा हा मंत्रपण पुढे नेण्याची आवश्यकता आहे. दंडकारण्य चळवळ गावा-गावात या माध्यमातून पोहोचेल असे त्या म्हणाल्या.
प्राचार्य माघाडे म्हणाले, दंडकारण्य चळवळ काळाची गरज बनली आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या परिसरात झाडे लावलेच पाहिजेत. त्याचबरोबर येणाऱ्या पिढ्यांना झाडे लावा पृथ्वी वाचवा हा संदेश देण्याची आवश्यकता आहे. सुमारे 80 हजार रुपये किमतीचे चिंच, आंबा, कडुलिंब, साताडा, जांभूळ आदी प्रकारचे रोपे मिळाली असून विद्यार्थ्यांनी ही रोपे आपल्या घराजवळ लावून त्याचे संवर्धन करण्याची व त्याच्या वाढीची नोंद करून ठेवण्याची आवश्यकता आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर थोरात यांनी केले तर आभार अशोक गुंजाळ यांनी मानले.
श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमात विद्यार्थी विद्यार्थिनींनी रंगीबेरंगी तसेच वारकऱ्यांचा पेहराव केला होता. ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘कावळा म्हणतो काव काव, माणसा माणसा झाडे लाव’ अशा घोषणा देत वृक्षदिंडीत सहभाग घेतला. वृक्षदिंडी मारुती मंदिरापाशी पोहोचल्यानंतर तेथे विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात रिंगण धरले. वारकरी परंपरेप्रमाणे फुगडी खेळत, नाचत, गात ग्रामस्थांना झाडे लावण्यासाठी प्रेरित केले. वृक्षारोपणाचा संदेश दिला.

