महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या अंकुश चत्तरचे हत्याकांड मंगळवारी विधिमंडळात पोहोचले. आरोपींमध्ये भाजपच्या नगरसेवकासह दहा जणांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगाराचा जात, धर्म आणि पक्ष न पाहता कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळात केली.
अहमदनगर शहरात नुकतेच घडलेले अंकुश चत्तर हत्याकांड काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळात स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केले.
गुन्हेगारीवर हल्लाबोल करताना आमदार थोरात म्हणाले, अहमदनगर शहरातील गुन्हेगारी चिंता वाढवणारी आहे. राज्य तुमचे आहे, गृहमंत्री तुमचे आहे, खासदार सत्ताधारी पक्षाचे आहे, आमदारही सत्ताधारी पक्षाकडे आलेले आहे आणि गुन्हेगारही सत्ताधारी पक्षाचाच आहे. त्यामुळे हे सर्व चिंता वाढविणारे आहे. जनतेला असे वाटते की गुन्हेगारांना सत्तेकडून अभय मिळतेय की काय? असा प्रश्न उपस्थित केला.
गृहमंत्री फडणवीस यांना संबोधून थोरात म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री इथे उपस्थित आहेत. गुन्हेगाराला जात नसते. गुन्हेगाराला धर्म नसतो. गुन्हेगाराला पक्ष सुद्धा नसतो. जो कोणी गुन्हेगार असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. नगरमध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे. याचा कुठेतरी तुम्ही बंदोबस्त केला पाहिजे. सरकार म्हणून एक अस्तित्व असतं. हे दाखवण्याची जबाबदारी आली आहे. लोक भयभीत आहेत. अत्यंत अस्थिर, अशांत वातावरण आहे. या मुद्द्यावर गृह विभागाची चर्चा घडवून आणण्याची अपेक्षा मी करतो. 
थोरातांना उत्तर देताना गृहमंत्री फडणवीस म्हणाले की…
सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांनी जो विषय मांडला आहे, त्याबाबत मी त्यांना अश्वस्थ करतो की, गुन्हेगाराचा जात, धर्म, पक्ष न पाहता त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि या सभागृहात त्याचे निवेदन देखील ठेवले जाईल.

