महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई : विधानसभेचे सभागृह अत्यंत महत्त्वाचे असून या सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर विवाद होत असतो. अनेक समस्या सोडवल्या जातात. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी पूर्ण करून ते ४ ऑगस्टपर्यंत अधिवेशन चालवावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.
सभागृहात सुरू असलेल्या चर्चेच्या दरम्यान बोलत असताना थोरात म्हणाले, विधिमंडळाचे हे सभागृह अत्यंत महत्त्वाचे आहे, धोरणात्मक बाबी सोबतच अनेक आमदार आपल्या मतदारसंघाचे प्रश्न घेऊन सभागृहात बोलत असतात. सभागृह चालल्याने त्यांना संधी मिळते. उशिरापर्यंत सभागृह चालवले जाते. त्याबद्दल विधानसभा अध्यक्षांचे आभार व्यक्त करत चर्चा अधिक विस्ताराने होण्याच्या दृष्टीने आणि मतदारसंघातील प्रश्नांना अधिक न्याय मिळण्याच्या हेतूने अधिवेशनाचा कालावधी पूर्ण करण्यात यावा. चार ऑगस्टपर्यंत अधिवेशन चालवावे अशी सभागृहाच्यावतीने अध्यक्षांकडे मागणी केली.
अधिवेशनामध्ये अनेक छोटे-मोठे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्या प्रश्नांना या निमित्ताने वाचा फुटली. प्रशासन जागे झाले, गतिमान झाले. या अत्यंत चांगल्या गोष्टी आहेत. या सभागृहाचा हेतू प्रश्न सुटावे हा आहे. त्यामुळे अधिवेशन पूर्ण काळ चालवावे जेणेकरून प्रत्येक सदस्याला न्याय देता येईल, असे थोरात म्हणाले.
अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, थोरात ज्येष्ठ; त्यांच्या भावना ‘बीएसी‘मध्ये मांडू…
बाळासाहेब थोरात हे विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य आहे. त्यांना या सभागृहाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या भावना अत्यंत महत्त्वाच्या आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आपण त्यांच्या भावना मांडू, त्यावर चर्चा करू आणि योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला दिले.

