महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या (BJP) वाट्याला 6, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (Shiv Sena) 3 आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) 3 जागा असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यपाल नियुक्त आमदारांचा फॉर्म्युला ठरला असला तरी प्रत्येकाच्या ठरलेल्या कोठ्यातून कोणाला संधी द्यायची याचा निर्णय अधिवेशनानंतर होणार आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची चर्चा झाल्यानंतर संभाव्य आमदारांची यादी राज्यपालांना पाठविली जाईल.
तत्कालीन मविआ सरकारच्या कार्यकाळात राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा गाजला होता. महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार होईपर्यंत माजी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी ठाकरे सरकारने दिलेली नावे मंजूर केली नव्हती. यावरुन राजकारणही रंगले होते. उद्धव ठाकरेच नाहीत तर खुद्द शरद पवार यांनी देखील भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली होती.
याच दरम्यान राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयात गेली. मात्र आता नियुक्तीची स्थगिती सुप्रीम कोर्टाने उठवल्याने आता राज्यपाल नियुक्त आमदार होण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे नव्या आमदारात आता महाविकास आघाडीचे नव्हे तर सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे आमदार असतील.
12 जागांवर कोणाची नियुक्ती?
दरम्यान सुप्रीम कोर्टाने स्थगिती हटवल्यानंतर 12 राज्यपाल नियुक्त आमदारांचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर आता आमदारांच्या नियुक्तीचा फॉर्म्युला देखील ठरला आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून या जागांवर कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता आहे. 2019 च्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या तसंच शिंदे आणि फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत पक्षात आलेल्या लोकांना जास्त संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच विधानपरिषदेची टर्म संपलेलेही अनेक जण संभाव्य आमदारकीसाठी आपल्या नेत्यांकडे लॅाबिंग करत असल्याची माहिती समोर येत आहे.

