महाराष्ट्र संवाद न्यूज
ठाणे – समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना ठाण्यातील शहापूर तालुक्यामध्ये भीषण दुर्घटना घडली असून काल रात्री ग्रेडर मशीन (क्रेन) पडून त्याखाली १७ जणांचा दबून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अजूनही काही लोक या गर्डर मशीनच्या खाली अडकल्याची शक्यता असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहापूर तालुक्यातील सरलांबे येथेही दुर्घटना घडली आहे. यात १७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून चार-पाच लोक जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून रात्रीच्या वेळी हे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे.
काय आहे नेमकी घटना: समृद्धी महामार्गावर सुरू असलेल्या कामाच्या गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब सुमारे 100 फूट उंचावरून मजुरांच्या अंगावर कोसळली. त्यामुळे या खाली बरेच कामगार दबले गेल्याचे भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी एनडीआरएफचे पथक मदत कार्य करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी या घटने संदर्भात ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे.
बाळासाहेब थोरातांची मदतीची मागणी:काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत सरकारच्या गलथानपणामुळे समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनल्याचे म्हटले आहे. या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली. तसेच मृत्यू पावलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी व जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च सरकारने करावा अशी मागणी केली आहे.
शहापूर इथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु असतांना क्रेन कोसळून १६ कामगारांचा मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दु:खद आहे.
सरकारच्या गलथानपणामुळे समृद्धी महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला आहे.
या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
या…— Balasaheb Thorat (@bb_thorat) August 1, 2023
मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर: पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त पुणे येथे असलेल्या मुख्यमंत्र्यांनी अपघाताचे वृत्त समजतात जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकाऱ्यांची बोलून मदतीच्या सूचना केल्या. अपघात दुर्दैवी असून त्याची चौकशी करण्याचे त्यांनी सांगितले तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांना तातडीने घटनास्थळी पाठवले. मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा त्यांनी केली असून जखमेंवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १७ जण मरण पावले आहेत. मृत कामगारांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणाही त्यांनी केली असून…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 1, 2023


