महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – महसूल प्रशासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, त्यासाठीचे अर्ज व विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे विविध दाखले आता ऑनलाइन स्वरुपात उपलब्ध आहेत. या सर्व योजना समाजासोबत युवकांपर्यंत अधिकाधिक प्रमाणात पोहोचण्यासाठी युवा पिढी व महसूल विभाग यांच्यात सुसंवाद असला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
जिल्हाधिकारी कोठे बोलले : महसूल विभागाच्यावतीने राज्यात १ ऑगस्ट ते ८ऑगस्ट दरम्यान सप्ताहाचे आयोजन शासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या सप्ताह अंतर्गत संगमनेर महाविद्यालयात आयोजित ‘युवा संवाद’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते.
यांची होती उपस्थिती : शिर्डीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, नायब तहसीलदार संदीप भांगरे, शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अनिल राठी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा व डॉ. रवींद्र तासीलदार आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी साधला मुक्त संवाद : महसूल प्रशासनाची रचना आणि योजनांची माहिती देत शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यात महसूल प्रशासन अग्रस्थानी असल्याचे सांगितले. महसूल प्रशासनासोबत नागरिकांचा जन्मापासून मृत्यूच्या नोंदणीपर्यंत विविध पातळीवर संबंध येत असतो. आता त्यासाठीचे विविध प्रकारचे अर्ज ऑनलाईन उपलब्ध आहेत.
ऑनलाइन पद्धतीने चालणाऱ्या कामकाजाची युवकांनी माहिती घ्यावी. काळानुरूप होणाऱ्या बदलांचा लेखाजोखा समजून घ्यावा. निवडणूक आयोगाद्वारे युवकांसाठी ऑनलाईन मतदार नोंदणी सुरू आहे. यासाठीच्या ॲपद्वारे पात्र विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी करावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा निपटारा करण्याचा आदेश : यावेळी विद्यार्थ्यांनी देखील शिष्यवृत्ती, पीकविमा, महाविद्यालयासाठी बस उपलब्धता आदी संदर्भात आपले प्रश्न मांडले. जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांची नोंद घेत त्यांचा निपटारा करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
डॉ. संजय मालपाणी म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणारे संगमनेर महाविद्यालय जिल्ह्यातील पहिले स्वायत्त महाविद्यालय आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्यांचा विचार करून महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीकरिता स्वाभिमान कोष व विद्याधन कलश योजना सुरू केल्या आहे. याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होत आहे. कमवा व शिका योजनेत साडेसहाशे विद्यार्थी काम करून शिक्षण घेत आहेत, ही निश्चित अभिमानाची बाब आहे.
कोविड १९ मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे पालक दगावले त्यांचे पालकत्व महाविद्यालयाने स्वीकारले आहे. महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी खेलो इंडियात जाऊन आले आहेत. खेळात महाविद्यालयीन विद्यार्थी निश्चितच नेत्रदीपक कामगिरी करत असून हे याचे सुंदर उदाहरण आहे. खेळाचे महत्व लक्षात घेत अद्यावत जिम्नेशियम तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तळागाळातील विद्यार्थ्यापर्यंत ज्ञानगंगा पोहोचविण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सीईओ रुपेश वालझाडे, कुलसचिव संतोष फापाळे, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, नायब तहसीलदार राजेश पोळ, महाविद्यालय मतदान अधिकारी डॉ. श्रीनिवास भोंग यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले.

