रविवार विशेष | प्रवीण पुरो
संभाजी भिडे ऊर्फ मनोहर भिडे याच्या उपद्रवाने सारा महाराष्ट्र ढवळून निघाला. शुक्रवारी संपलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा सर्वाधिक वेळ याच भिडेंच्या उपद्रवाने घेतला. विरोध करायचा त्यांनी विरोध केला पण आपल्या गृहमंत्र्यांनी राज्याची लाज रस्त्यावर आणली. भिडे हे आमच्यासाठी गुरुजीच असल्याचं सांगत गृहमंत्र्यांनी शिष्याचा निर्बुध्दपणा उघड केला. महाराष्ट्राला मान खाली घालायला लावली. देशातील महान व्यक्तींची अश्लाघ्य शब्दात अवहेलना करणार्या अर्धवट व्यक्तीची इतकी तळी आजवर कोणी उचलली नसेल. हे करून आपण भाजपला खड्ड्यात घालत आहोत याचीही जाण गृहमंत्रीपद सांभाळणार्या देवेंद्र फडणवीसांना राहिली नाही.
एकीकडे सत्ता राखण्याचा व्याप सांभाळता सांभाळता दुर्बुध्द भिडेंसारख्याला गुरूचा दर्जा देऊन पक्षाला अधिक खायित टाकण्याचं काम गृहमंत्र्याने केलं आहे. एका मर्यादेपर्यंत हे ठिक होतं. पण ही व्यक्ती मर्यादा सोडून जेव्हा उपद्रव करते तेव्हा तिचा बंदोबस्त वेळीच करावा. त्याऐवजी तिची तळी उचलली की स्वत:साठी आणि पक्षासाठी खड्डे खोदाईच असते, हे गृहमंत्र्याने लक्षात घेतलेलं दिसत नाही.
गेला आठवडाभर भिडे नावाच्या एकाच विषयाने शिंदे सरकारची लायकी विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या पायर्यांवर काढली. मनोहर भिडेचं पाठिराखं सरकार म्हणून उघड आरोप झाला. भिडे हा भाजपचा पाठीराखा आहे, म्हणूनही यापूर्वीच बोलबाला झाला आहे. या आरोपाचा समाचार घेण्याच्या संधीत गृहमंत्र्याने भिडे आमच्यासाठी गुरुजीच आहे, असं सांगत राज्याची लायकी सिध्द केली. भिडे हा माणूस हिंदुत्वासाठी काम करत असल्याने आपल्याला त्याचा अभिमान असल्याचं सांगताना आपण या माणसाच्या सगळ्याच कृत्यांवर पांघरूण घालतो आहोत हेही गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी लक्षात घेतलं नाही. भिडेचं समर्थन करण्यासाठी फडणवीसांनी सावरकरांवरील लिखाणाचा संदर्भ विधानसभेत दिला.
काँग्रेस पक्षाच्या ‘शिदोरी’ या नियतकालिकात छापण्यात आलेल्या लेखाचा आधार घेत या नियतकालिकाविरोधात गुन्हा नोंदवण्याची घोषणा केली. असे गुन्हे का नोंदवले जातात, हे गृहमंत्री सांभाळणार्या व्यक्तीला ज्ञात नसेल तर नवलच म्हटलं पाहिजे. त्यात हे पद सांभाळणारे फडणवीस शिक्षणाने वकील आहेत. शिवाय राज्याची धुरा पाच वर्षं त्यांच्याच खांद्यावर होती. गुन्हे नोंदवण्याच्या विषयाबाबत ते अनभिज्ञ असण्याचा प्रश्नच नाही. पण निमित्ताला कारण देत ‘शिदोरी’विरोधात गुन्हा दाखल करण्याची घोषणा केली आणि सावरकरांनाही बदनामीच्या जांजाळात अडकवलं. तटस्थ असलेली लोकं सावकरांविषयी आस्था व्यक्त करत होती. पण याचा सातत्याने बाऊ करत सत्ताधार्यांनी विशेषत: फडणवीसांनी सावरकरांच्या विरोधात बदनामीलाच चालना दिली असं म्हणता येईल. सावरकरांवरील कोणत्याही टीकेने महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेला कुठेही बाधा आलेली नाही. जेव्हा येते तेव्हा त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही गृहमंत्री म्हणून फडणवीस यांचीच आहे. असं असताना गुरूजीच्या आरोपाआड सावरकरांना कामाला लावण्याचा उद्योग कदापि योग्य नाही.
ज्या भिडेच्या गुरूपदासाठी फडणवीस इतके असूसलेत त्याहून कित्येक पटीने साईबाबांना गुरू मानणार्यांची संख्या आहे, हे फडणवीस यांना कोणी सांगायची आवश्यकता नाही. राज्यात असं एक ठिकाण नाही जिथे साईचरणी कोणी लीन झाला नाही. देशातल्या प्रत्येकाला साईंविषयी आस्था आहे. साईंच्या देवत्वाविषयी कोणाच्या मनात शंका नाही. अगदी ते मुस्लिम असल्यासही कोणाला त्यांचं वावडं नाही. साईबाबा मुस्लिम असल्याचा भिडेंसारख्या उपद्रवींनी सातत्याने बोलबाला करूनही साईंना मानणार्यांची संख्या कमी झालेली नाही. आणि कोणी यासाठी धर्मही सोडलेला नाही. गुरूस्थानी साईंची पूजा करणार्यांची संख्या तर जगभरात अगणित आहे. अशा साईंविषयी वायफळ बडबड करणार्या भिडेविषयी साईंच्या शिष्यांचं मत एकदा फडणवीस यांनी जाणून घ्यावं. म्हणजे भिडेंची पूजा कशाने होत आहे, हे लक्षात येईल. त्यातही साई हा विषय महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी भावनिक आहे.
पटत नसला तरी कोणाच्याही भावनेला हात घालण्याचा अधिकार भिडेला कोणी दिलेला नाही. तीर्थक्षेत्र म्हणून नावाजलेल्या साई दरबारावर शासनाचा अधिकार आहे. राज्याच्या विकासात शिर्डीच्या या तीर्थक्षेत्राने दिलेला हात लक्षात घेतला तर शासनाने आणि सत्ता चालवणार्यांनी या स्थानाविषयी आणि साईबाबांच्या अस्तित्वाविषयी अधिक सजग राहणं ही अपेक्षा आहे. अशावेळी कोणी उठावं आणि साईबाबांना मुस्लिम ठरवावं, त्यांना घराबाहेर काढा असले आदेश द्यावे, असा आचरटपणा कोणी करत असेल तर त्याच्या वयाची तमा न बाळगता असल्या व्यक्तीला तुरुंगाची हवा द्यायला हवी होती. महाराष्ट्राच्या प्रगतीत हात देणार्या या तीर्थक्षेत्राची बदनामी यामार्गे करण्याचा प्रयत्न भिडेने चालवला आहे. या बदनामीमुळे शिर्डीचं महत्व कमी झालं तर त्याहून दुर्देव नाही. ही बदनामी करणार्यांच्या मुसक्या आवळण्याऐवजी भिडेची पाठराखण करण्यात सरकार धन्यता मानते. गुरुजीच्या या उपद्व्यापामुळे कोट्यवधींच्या संख्येतल्या साईंच्या अनुयायांना काय वाटलं असेल, याचं भान फडणवीसांनी ठेवलं नाही. साईंच्या या अनुयायांनी भाजपकडे पाठ फिरवली तर राज्यात त्या पक्षाचं काय होईल, याचा विचार गुरुजींचे स्वत:ला शिष्य समजणार्या फडणवीस आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी करावा. अनुयायांच्या भावनेचा जसा वापर होतो तसा त्याच्या परिणामाचाही फटका बसू शकतो. भाजपने भावनेचा असा वापर अनेकदा केला आहे. रोह्याच्या धर्माधिकारी कुटुंबियांना गोंजारत भाजपने आपली पोळी अनेकदा भाजून घेतली. याचा अतिरेक झाला आणि 15 जणांना हकनाक जिवाला मुकावं लागलं.
साईं इतकंच महात्म्य भारताच्या राजकीय पटलावर राष्ट्रपीता महात्मा गांधींचं आहे. जगाच्या पाठीवर या महान व्यक्तीविषयी आदराचं स्थान आहे. अहिंसेचा पुजारी म्हणून जगाने गांधींना स्वीकारलं, त्यांचा गौरव केला. भारतात गांधींच्या नावाने खडे फोडणारे बाहेरच्या देशात गेल्यावर गांधींच्या पायावर डोकं ठेवतात. असं असताना गुरुजीने उठावं आणि गांधींना मुस्लिम ठरवून टाकावं, हा म्हणजे बुध्दीचा अपलापच होय. ठराविक वयात गेल्यावर माणसाची बुध्दी नाठी होते, असं म्हणतात. ती काम करेनासी होते. वायफळ बडबड करणं, आगपाखड करणं, आदळआपट करणं असे दोष नाठीत येतात. फडणवीसांचे गुरू असलेल्या भिडेंची वयोमर्यादा आता बुध्दीपारखी झाली आहे. ते कधी आंब्यातून पुत्रप्राप्ती करून देतात तर कधी विभूतीतून पोटदुखी घालवतात. आपण सांगू ते हिंदुत्व न माणार्याला ते मुस्लिम ठरवतात. ऐकायला येणार्या निर्बुध्द अनुयायांना त्याचं काहीही वाटत नाही.
ज्याच्याकडे राज्याची जबाबदारी आहे तो उपमुख्यमंत्रीच अशा गुरूची पाठराखण करतो, म्हटल्यावर अनुयायी हे तर अर्धअंधळेच. त्यांच्याकडून अपेक्षा काय कराव्यात? गुरू जेव्हा वाह्यात वागतो तेव्हा शिष्याने त्याच्या वर्तणुकीची जाणीव गुरूला करून द्यायची असते. फडणवीसांनी आजवर ते केलं नाहीच. उलट चिथावणी द्यावी असं एकार्थी समर्थनच फडणवीस करत गेले. भीमा-कोरेगावच्या दंगलप्रकरणात गुन्हे दाखल होऊनही गुरू बाहेरच राहिले. ज्यांचा संबंध नाही अशा नावाजलेल्यांना अटक झाली. पाच वर्षांपासून त्यांना कोठडीत ठेवलं गेलं. गुरू मात्र मोकाट राहिल्याने तो कोणालाच जुमानासा झाला. आपणच योग्य असल्याचा गुरूचा समज झाला. हुकुमशहा सांगतो तसं गुरूजी खुर्चीवर बसून आदेश सोडू लागले. निर्बुध्द शिष्यांसाठी त्याचे आदेश प्रमाणच. जाती जातीत, धर्मा धर्मात तेढ वाढली. याने महाराष्ट्राची लाज गेली. पुरोगामी परंपरेची वासलात लागली. एव्हाना दुसरं कोणी हे केलं असतं तर त्याच्या मुसक्या आवळायला सरकारने कमी केलं नसतं. पण गुरूचे चेलेच सत्तेवर असल्याने हे होणं नाही.

