महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर – गाव पातळीवर असलेल्या प्रत्येक यंत्रणेने सतर्क आणि संवेनशीलतेने काम करण्याची आवश्यकता आहे. यापुढे निष्काळजीपणामुळे एकही जीव जाऊ नये यासाठी प्रशासनाने सतर्क राहायला हवे. अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी प्रशासनाला केल्या.
घेतली अधिकाऱ्यांची बैठक: कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या घटनेची राज्य महिला आयोगाने सुमोटो दखल घेतली आहे. आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी शुक्रवारी कोपरगाव तालुक्याचा दौरा करत याप्रकरणी प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांची तहसील कार्यालयात बैठक घेत या प्रकरणी आढावा घेतला.
काय होती घटना: वडाळी (नाशिक) येथील रहिवासी असलेली रेणुका किरण गांगुर्डे ही महिला आपल्या माहेरी कारवाडी (ता. कोपरगाव) येथे आली होती. 3 ऑगस्टला सकाळी तिला बाळंतपणासाठी चासनळी येथील प्राथमिक केंद्रात आणण्यात आले होते. यावेळी तेथे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने आरोग्य सेवक असलेल्या कर्मचाऱ्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल खोत यांच्याशी संपर्क केला असता या महिलेला त्यांनी बाळंतपणासाठी कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितले.
महिलेचा झाला मृत्यू: त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील चालक संजय शिंदे यांनी रुग्णवाहिकेमध्ये पुरेसे इंधन नसल्याचे कारण सांगत या महिलेला पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यास उशीर केला. त्यानंतर या महिलेला रुग्णवाहिकेतून धामोरी येथील उपकेंद्रात दाखल करण्यात आले. तेथे या महिलेची प्रसूती करण्यात आली. मात्र महिलेची प्रकृती अत्यवस्थ असल्याने तिला कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र तत्पूर्वीच संबंधित महिलेचा मृत्यू झाला.
संबंधितांवर झाली कारवाई: या घटनेची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी गंभीरतेने दखल घेत चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी साहील त्रिंबकराव खोत यांचे निलंबन केले तर द्वितीय बंधपत्रीत वैद्यकीय अधिकारी डॉ. साक्षी सेठी आणि वाहन चालक संजय शिंदे यांची सेवा समाप्त केली. त्यानंतर या तिघांविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. तर धामोरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका सी. एल. आरखडे आणि समुदाय आरोग्य अधिकारी नेहा वाघमारे यांच्याविरुद्ध जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी प्रशासकीय कारवाई केली आहे.
रुपवते यांचा संवाद: दरम्यान राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत नव्याने रुजू झालेल्या वैद्यकीय अधिकारी, स्टाफ व आशा सेविकांशी संवाद साधला. त्यानंतर मयत झालेल्या महिलेच्या कारवाडी येथील घरी भेट देऊन परिवाराची विचारपूस केली. मयत गांगुर्डे यांच्या बाळाला योग्य त्या सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाला सूचना त्यांनी केल्या.
दौऱ्यादरम्यान हे अधिकारी होते उपस्थित: यावेळी कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले, गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, बाल विकास प्रकल्प अधिकारी पंडित वाघेरे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी अभिराज सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी व्ही. बी. घोलप, तालुका संरक्षण अधिकारी विकास बागुल, केस वर्कर वन स्टॉप सेंटर अहमदनगरच्या ममिता पावरा, समुपेदशक नितीन थोरात, समुपदेशक वैशाली झालटे उपस्थित होते.

