महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सातत्याने शिवसेनेचा उमेदवार विजयी होत आला आहे. शिवसेनेचा हा पारंपारिक मतदार संघ असल्याने यावेळी देखील येथून शिवसेना उद्धव बाळासाहेब (ठाकरे) पक्षाचाच खासदार निवडून जाईल. त्यामुळे मविआ आणि India आघाडीला धोका पोहोचेल असे वक्तव्य कोणी करू नये, असे शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमर कतारी यांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या बैठकीमुळे निर्माण झाला गोंधळ: दोन दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये शिर्डी लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे निरीक्षक माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसने शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. तसेच गद्दार खासदारांबद्दल बोलताना शिवसेना (ठाकरे) पक्षाचीदेखील खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर कतारी यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.
भाजपच्या राजकारणाला शह देत महाविकास आघाडी सत्तेत येणार: शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार सातत्याने विजयी झाला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेतकरी कामगार सामान्य नागरिक अशा सर्वांना सोबत घेत शिवसेना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने केलेल्या विश्वासघाताच्या राजकारणामुळे जनता संतप्त आहे. शिवसेनेच्या वाईट काळात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह मित्र पक्षांनी एकत्रित येत महाविकास आघाडी स्थापन केली. भाजपचे राज्यातील पक्ष फोडाफोडीचे राजकारण बघता येत्या निवडणुकीत ही महाविकास आघाडीच पुन्हा सत्तेत येणार आहे.
आघाडीत बिघाडीची खोड नको: भाजपाने केलेल्या कुरघोडीला उत्तर देण्यासाठी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहून नागरिक मतदान करणार आहेत. मात्र आघाडी म्हणायची आणि बिघाडी करायची खोड जर कोणी करणार असेल तर केवळ ठाकरे या एकमेव ब्रँड वर देखील अधिक जागा जिंकण्याची ताकद ठाकरेंच्या शिवसैनिकांकडे आहे, असा इशारा देखील त्यांनी दिला.
बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास: काँग्रेसचे ज्येष्ठ व संयमी नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रामाणिक नेतृत्वावर आम्हाला विश्वास असून उद्धव ठाकरे व सामान्य शिवसैनिकांना त्रास होईल असा कोणताही निर्णय ते घेणार नाहीत अशी आशा आहे मात्र पक्षाने जबाबदारी दिली म्हणून कोणी काहीही बरळत राहिल्यास आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषदा, महापालिका निवडणुकांमध्ये एकत्रपणे कसे लढायचे? भाजपच्या हुकुमशाही विरोधात कसे उभे राहायचे? याचा देखील विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे मविआ आणि India आघाडीला धोका पोहोचेल असे वक्तव्य कोणी करू नये.
आठवलेंचा पराभव, वाकचौरे यांना शिवप्रसाद आणि लोखंडे यांचे गाठोडे मुंबईला: याउलट एकदिलाने उभे राहून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे पक्षाचा उमेदवार निवडून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत. या मतदारसंघात भाजपचे सहयोगी केंद्रीय मंत्री असलेले रामदास आठवले यांचा पराभव झाला आहे. शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्या भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवप्रसाद देत दाखवून दिलेली शिवसेना काय असते ते दाखवून दिले. आणि आता शिवसेनेच्या बळावर खासदार झालेल्या व गद्दारी केलेल्या सदाशिव लोखंडे यांना देखील या निवडणुकीनंतर आपले गाठोडे बांधून मुंबईला परतावे लागणार असल्याचे कतारी यांनी म्हटले आहे.

