अहमदनगर जिल्ह्यात 24 लाख लाभार्थी, राज्यातील १ कोटी ४० लाख लाभार्थ्यांना योजनेचा लाभ
सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना आम्ही थांबविली
राज्यातील सर्व शासकीय रूग्णालयात आता मोफत उपचार
महाराष्ट्र संवाद न्यूज
शिर्डी – गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
शासकीय योजनांचा लाभ: शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे गुरुवारी ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते.
यांची उपस्थिती: यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, आमदार किरण लहामटे, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार आशुतोष काळे, आमदार सत्यजित तांबे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, जिल्हा परिषद सदस्या शालीनी विखे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
एक कोटी चाळीस लाख लाभार्थ्यांना लाभ: ‘शासन आपल्या दारी’ अभियानात अहमदनगर जिल्ह्यात २४ लाख नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे. यापैकी ३० हजार लाभार्थी आज येथे उपस्थित आहेत, असे नमूद करून मुख्यमंत्री शिदे म्हणाले, आजच्या या शासन आपल्या दारी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. आजपर्यंत शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ४० लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना आम्ही थांबविली आहे. नागरिकांना चकरा माराव्या लागू नये यासाठी शासन काम करत आहे. एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत आहे. जिल्ह्यात लाभार्थ्यांना ३ हजार ९८२ कोटींचा लाभ देण्यात आला आहे.
केंद्र सरकारचे पाठबळ: राज्यातील अनेक योजनांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम केंद्र शासनाने केले आहे. राज्याच्या विकासासाठी शासन झोकून देऊन काम करत आहे. आजही राज्यातील निम्म्या साखरेचे उत्पादन अहमदनगर जिल्ह्यातून होत आहे. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. समृध्दी महामार्गामुळे शिर्डी व परिसराच्या विकासाचे नवे पर्व सुरू होत आहे.
मोफत उपचार: राज्यातील सर्व शासकीय रूग्णालयात आता मोफत उपचार मिळत आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत साडेबारा कोटी जनतेला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे.
निळवंडे प्रकल्प मार्गी: ५३ वर्षांपासून रखडलेला निळवंडे प्रकल्प मार्गी लावण्याचे काम शासनाने केले आहे. शासनाने ३५ सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता नव्याने दिली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत.
शेतकऱ्यांच्या पाठीशी: सध्या राज्यात पावसाने ओढ दिली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे, असे त्यांनी सांगितले.

