महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – तालुक्यातील नान्नज दुमाला येथील जयवंत विलास कडवे (वय २२) या तरुण सलून व्यावसायिकाने शुक्रवारी (ता. १८ ऑगस्ट) आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपविली. मात्र, त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्या आईसह नातेवाईकांनी केला असून, या संदर्भात चौकशी व्हावी यासाठी संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्यांकडे (DYSP) निवेदन देण्यात आले आहे.
काय झाले: नान्नज दुमाला येथे जयवंत विलास कडवे हा तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. शुक्रवारी त्याने राहत्या घरातील अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. याची माहिती संतोष सुखदेव वाघ यांनी कडवे यांच्या मामास रवींद्र भाऊसाहेब वाघ यांना फोनवरुन कळविली. त्यानंतर वाघ तात्काळ संगमनेर बसस्थानकावरुन घरी परतले. त्यानंतर त्यांनी त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेतून खाली घेऊन खासगी रुग्णवाहिकेतून घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले.
काय आहे आरोप: त्यावरुन संगमनेर तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. परंतु, मयत जयवंतला गावातीलच त्याच्या एका मित्राने आर्थिक देवाण-घेवाणीतून मारहाण केली. शिवाय तो सतत त्याला त्रास द्यायचा. त्याच्या त्रासाला वैतागून अखेर जयवंतने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आईसह नातेवाईक आणि नाभिक समाज बांधवांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
कोणी केली मागणी: सदर निवेदनावर महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब जाधव, कचरु भालेकर, संजय बिडवे, प्रकाश बिडवे, खंडू वाघ, रावसाहेब वाघ, लक्ष्मण वाघ, संतोष बिडवे, वैभव बिडवे, गोरख शिंदे, सतीष वाघ, गोरक्षनाथ मदने, प्रकाश बिडवे, रमेश सस्कर आदिंच्या सह्या आहेत.

