महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – शुक्रवारी मध्यरात्री नासिक-पुणे महामार्गावर संगमनेरनजीक कऱ्हे घाटाजवळ एका संशयास्पद वाहनातून मुंबईच्या दिशेने जाणारे गोमांस पकडण्यात तालुका पोलिसांना यश मिळाले आहे.
साडेसहा लाखाचा मुद्देमाल: या कारवाईत पोलिसांनी एका टाटा कंपनीच्या वाहनासह तब्बल साडेसहा लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. यात अडीच लाख रुपये किमतीच्या एक हजार किलो गोवंश जनावरांची कत्तल केलेल्या गोमांसाचा समावेश असून पोलिसांनी या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांना अटक केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
यांना पकडले: मुज्जफ्फर जाकीर हुसेन कुरेशी (वय २८ वर्ष, रा. दादामिया इस्लामी चाळ, कुरेशीनगर, कुर्ला (पूर्व) मुंबई) आणि असलान अस्लम कुरेशी (वय २२वर्ष, रा. अल्ताफ बिल्डिंग, कब्रस्तान रोड, कुरेशीनगर, कुर्ला (पूर्व) मुंबई) अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुन्हा दाखल: राज्यात गोवंश जनावरांची कत्तल करण्यास बंदी असतानादेखील कत्तल केलेले गोवंश जनावरांचे गोमांस वाहतूक करताना आढळून आल्याने पहाटे तीन वाजता संगमनेर तालुका पोलिसांनी मुज्जफ्फर जाकीर हुसेन कुरेशी आणि असलान अस्लम कुरेशी या दोघा जणांविरोधात पोलीस शिपाई बाबासाहेब केशव शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड विधान कलम २६९, ४२९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५(अ), ५(क), ९ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
तपास: दरम्यान संगमनेरातील कत्तलखान्यातून हे गोमांस मुंबईला जात असल्याचा संशय असून पोलीस यासंबंधीची माहिती घेत आहेत. परिविक्षाधिन पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहे.

