महाराष्ट्र संवाद न्यूज
रविवार विशेष @ प्रवीण पुरो
महाविकास आघाडी सरकारला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी जे-जे कारण ठरले त्यांच्याशी आघाडीतील घटक पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी किती जवळीक साधावी याला काही मर्यादा असायला हवी. सारं काही हातातून हिसकावून घेणार्या अशा बदमाशांना त्यांची जागा दाखवण्याची शिकस्त आघाडीतल्या प्रत्येक नेत्यामध्ये असायला हवी. पण दुर्देवाने अशांविषयी आघाडीतले घटकपक्ष आणि त्यांचे नेते बेरजेचं राजकारण करताना दिसतात तेव्हा त्यांनाही सत्तेची लालसा आहे की काय असं वाटतं. या संशयाने जनसामान्यांमध्येही अशा व्यक्ती आणि त्यांच्या पक्षाविषयीची सहानुभूती आपोआप लोप पावत असते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचे प्रमुख, देशातील धुरंधर राजकारणी शरद पवार यांच्याविषयी अशाच शंका घेतल्या जाऊ लागल्या आहेत. या शंका आघाडीसाठी कमालीच्या घातक आहेतच पण भाजपला वठणीवर आणण्यासाठी एकत्र आलेल्या 28 पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीवरही त्या विपरित परिणाम करणार्या आहेत.
अजित पवारांच्या बंडाळीमागे शरद पवारांचा आशीर्वाद असल्याच्या चर्चा पवार यांच्या या असल्याच वागणुकीमुळे होत असतात. याला उत्तर देताना राजकारणात असं वागायचं नसतं, असलं पालूपद लावलं जातं. वास्तविक राजकारणात खासगी संबंध आणि खासगी संबंधात राजकारण कोणी येऊ देता नयेे, अशी एक धारणा असते. पण महाराष्ट्रात या धारणेला राजकारण्यांनीच विशेषत: भाजपच्या नेत्यांनी मुठमातील दिलीय. असा नेता आणि त्याच्या पक्षापासून चार हात दूर राहणंच आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक ठरतं. एखाद्या व्यक्तीच्या खासगी जीवनात भाजपचे नेते खुशाल टोकवतात आणि स्वत: मात्र टग्यासारखे वावरतात. हे आज घडतं असं नाही. देशात सत्ता मिळाल्यापासून त्या पक्षाच्या नेत्यांची वर्तणूक अशीच आहे. याचा सर्वाधिक फटका बसलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना हे कळत नाही हे विशेष.
राज्यातल्या सत्तेसाठी फडणवीस यांनी विरोधकांना ज्या प्रकारे सतावलं. त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयच्या धाडी घातल्या. अगदी शरद पवारांना त्यांनी सोडलं नाही, ते पाहाता याचं संचालन करणार्या फडणवीस यांच्याशी व्यक्तीगतही कोणी संबंध राखू शकणार नाही. मात्र तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एमसीए निवडणुकीच्या निमित्ताने फडणवीस आणि शेलार यांच्याशी संधान राखलं आणि आपण ठार कोडगे आहोत हे दाखवून दिलं. आपल्या नेत्यांना हैराण करणारा म्हणून सामान्य कार्यकर्ते फडणवीसांचा मिळेल त्या वाटेने निषेध करत असताना त्याच फडणवीसांच्या गळ्यात गळे घालून शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी खरा क्रिकेटपटू असलेल्या संदिप पाटील यांचा पराभव करायला लावला. हे करताना आपल्या कार्यकर्त्यांना काय वाटत असेल, याचा ना पवारांनी विचार केला ना आव्हाडांनी. आघाडीचं सरकार पाडण्यासाठी भाजपने विशेषत: फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्या कंपूला शिवसेनेतून ज्या पध्दतीने बाहेर काढलं, ते पाहाता आघाडीने अधिक जबाबदारीने पावलं टाकायला हवी होती. एकेका नेत्याचं नाव घ्यायचं आणि त्याला त्याच्या पक्षातून बदनाम करायचं सूत्र भाजपने अवलंबलं. शिवसेनेसारखा पक्ष फोडून त्याचं अस्तित्वच नाकारण्याची घातकी कारवाई फडणवीस यांनी केल्यावर तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अधिक सतर्कता दाखवणं आवश्यक होतं. ती न दाखवल्याने अजित पवार यांचा गट फुटून बाहेर पडला आणि राष्ट्रवादीची मालकीही शरद पवारांकडून काढून घेतली.
पवारांनी जन्माला घातलेल्या पक्षावर फुटीर दावा करतात तेव्हा या फुटीरांना त्यांची जागा दाखवणं अपेक्षित असतं. जे शिवसेनेने केलं ते राष्ट्रवादीला करणं अवघड नव्हतं. सेनेच्या लढाईत फारसं यश आलंही नसेल पण यामुळे राज्यातल्या आणि देशातल्या जनतेमध्ये सेनेविषयीची सहानुभूती आपोआप वाढली आणि भाजपची छी-थू झाली. येणार्या निवडणुकांमध्ये भाजपचं काही खरं नाही, हे लक्षात आल्यावर अधिकतर विरोधकांना आपल्याकडे घेण्याचा सपाटा त्या पक्षाने लावला. आठवडाभर आधी 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नेता थेट सत्तेत उपमुख्यमंत्री म्हणून बसला.
अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा शब्द देताना शरद पवारांना सोबत आणलं पाहिजे, अशी अट घालण्यात आली. यासाठी केंद्रातील कृषीमंत्री पद खाली करण्याची तयारीही दर्शवण्यात आली. हे घडवून आणण्यासाठी अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या दोनवेळा भेटी घेतल्या. दोन दिवसांपूर्वी टीकेच्या लाखोल्या वाहणारे तिथे चक्क पवारांच्या पायावर डोकं टेकत होते. तरीही पवार बधले नाहीत. हा सारा खेळ मूळ राष्ट्रवादीविषयी संभ्रम निर्माण करण्याचा फडणवीस यांनी रचलेला डाव होता, हे पवारांनाही कळलं नाही.
ज्या शब्दात फुटीरांची कानउघडणी करायला हवी होती ती पवारांनी केली नाही. यामुळे पवारांभोवतीच संशयाचं जाळं अधिक घट्ट झालं. पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींना द्यावयाच्या लो. टिळक पुरस्काराच्या सोहळ्यात अनुपस्थित राहून भाजपने आपल्यावर आणलेल्या आपत्तीचा निषेध करावा ही विरोधकांची अपेक्षाही पवारांनी मानली नाही. उद्योगपती अतुल चोरडीया यांच्या घरी अजित पवार यांनी शरद पवार यांनी गुप्त भेट घेतल्याने तर पवारांच्या मनात आहे तरी काय, असा प्रश्न घटक पक्षांच्या नेत्यांना पडणं स्वाभाविकच होतं. पक्षात उभी फूट पाडून पक्षच हायजॅक करणार्या कोणाचीही गय पवारांनी करायची आवश्यकता नव्हती. पण पवारांनी बुचकळ्यात टाकणारी भूमिका घेत महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि या घटकपक्षांच्या सामान्य कार्यकर्त्यांनाही शंकेच्या वावटळीत ढकललं.
खरं तर राष्ट्रवादीची उभारणी ही स्वत: शरद पवार यांनी केलेली असताना त्यांच्या पक्षावर अजित पवार यांनी दावा करणं हे स्वत: पवारांनी खपवून घ्यायलाच नको होतं. निवडणूक आयोगाबरोबरच कायदेशीर लढाईतून फुटीरांना जेरीस आणण्याचा प्रयत्न पवार आपल्या नेत्यांना करायला लावतील, अशी अपेक्षा असताना कायदेशीर लढाईत शिवसेनेचं झालं तोच न्याय आपल्या वाट्याला येईल, असं अनुमान काढत पवारांनी फुटीरांना रान मोकळं करून दिलं. असल्या मौनाचा फायदा अजित पवारांकरवी फडणवीस यांनी घेतला आणि विधिमंडळ पक्ष म्हणून अजित पवार गटाचा दावाही केला. इतकं करून हे फुटीर थांबले नाहीत.
पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे प्रफुल्ल पटेल यांनी ‘दिल्लीत काय व्हायचं हे सांगायला लावू नका’, असा सज्जड इशारा खुद्द पवारांनाच दिला. राजकारणाची कायम सौदेबाजी करणारा हा नेता पवारांना उघड धमकी देत असतानाही पवार काही बोलत नाहीत याचा अर्थ जो-तो आपल्या परीने काढू लागला. अडीच वर्षाच्या तुरुंगवासातून बाहेर येऊनही पवारांनी ज्यांचं पुनर्वसन केलं ते छगन भुजबळ तर चांगलेच वस्ताद निघाले. तेही पवारांना आव्हानाची भाषा करू लागले. राष्ट्रवादीच्या नावाने सारी पदं आपल्या घराची जहागिरी करून घेतलेले सुनील तटकरे तर पवारांना उघड आव्हान देऊ लागले. इतके उपद्व्याप केल्यावरही ही माणसं पवारांची मागल्या दाराने भेट घेतात आणि पवारही त्यांना भेट देतात हे पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्याला रुचलं नाही. पक्षाशी प्रामाणिक असलेल्या जयंत पाटील आणि रोहित पवारांसारख्यांची होणारी गोची पहावत नव्हती. शरद पवारांच्या आतल्या गाठीच्या याच स्वभावाचा पक्षाच्या विश्वासार्हतेवर विपरीत परिणाम होत असल्याचं दिसू लागलं होतं.
आता तर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आमचेच असल्याचं सांगण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सुळे ज्यांना आपले मानतात त्या अजित पवार यांनी पवारांना पक्षातून काढून टाकलंय याची जाण सुप्रिया सुळे यांना आहे की नाही? खूप चर्चा झाल्यावर कुटुंबात राजकारण आणायचं नसतं, असं सांगण्याचा प्रयत्न झाला. वास्तवात ज्याच्यामागे कुटुंबाची भीस्त आहे त्यांनी राजकारणाचा व्याप हातात घेऊ नये. काकांनी कुटुंब सांभाळायचं आणि पुतण्याने त्यावर पाणी टाकायचं याला कुटुंब राखणं नाही म्हणत. अशांना कुटुंबाहून सत्ता प्यारी असते, हे अजित पवार यांनी दाखवून दिलं आहे. पुतण्याला भेटायला पवारांना कोणाची ना असण्याचं कारण नाही. त्यासाठी मुंबईतलं आपलं घर, कार्यालय आहे. बारामतीचं घर आहे. यासाठी चोरडीयांचं घर आणि तेही रात्री? हा सारा प्रकार शरद पवार यांना आणि त्यांच्या गटाला खड्ड्यात घालण्याची चाल होती.
अपेक्षेप्रमाणे सहकारी शिवसेनेनेही विश्वासावर संशय व्यक्त केला. काँग्रेसच्या नेत्यांचीही शंकेची पाल चुकली आणि अजित पवार यांना पक्षात पुन्हा न घेण्याची घोषणा पवारांना करावी लागली. ज्या ‘इंडिया’च्या 28 घटक पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी पवारांवर विश्वास ठेवला त्या विश्वासाला तडे जाऊ लागले होते. सहानुभूतीच्या लाटेने अनेकांना अस्मान दाखवणार्या घटना याआधीही महाराष्ट्राने आणि देशाने पाहिल्यात. महाराष्ट्रात त्या पुन्हा आशादायी आहेत. यासाठी स्वत: पवारांनीच विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

