आम्ही एक झटका दिला आणि त्यांना ऑनलाईनवरुन थेट लाईनवर आणलं…
काही लोक पाटण्यात जमले आणि द्वेषाची खिचडी शिजवू लागले
अजित पवारच सरकारमध्ये आले आणि सरकार आणखी मजबूत झाले
महाराष्ट्र संवाद न्यूज
परभणी – “तुमचा भोंगा हा कायम शिव्या शाप देण्यासाठी वाजतो पण आमचा भोंगा हा शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लोकांसाठी वाजतो.” ‘काही लोक पाटण्यात जमले आणि द्वेषाची खिचडी शिजवू लागले’, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी सांगत रविवारी विरोधकांवर निशाणा साधला.
शासन आपल्या दारी: रविवारी परभणीमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आत्तापर्यंत दीड कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे काम सुरू असून यात प्रत्येक लाभार्थ्याला लाभ मिळतोय. या माध्यमातून आत्तापर्यंत बावीस हजार ट्रॅक्टर, साडेबावीस हजार रोटरव्हेटर वाटले आहे. चार लाख विद्यार्थ्यांना 1351 कोटी रुपयांचं वाटप आतापर्यंत केले. महिलांना त्यांचं कुटुंब सांभाळताना स्वतःच्या पायावर उभा करण्याची जबाबदारी शासनाने घेतली असून महिला बचत गटाची योजना देखील अधिक मजबूत करण्याचे काम शासन आता करत आहे. महिलांसाठी केवळ बचत गटच नाही तर शक्तीगट तयार करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
आम्ही एक झटका दिला आणि… “यापूर्वी काही लोक घरात बसून राज्याचा कारभार ऑनलाईन करत होते, परंतु आम्ही त्यांना एक झटका दिला आणि ऑनलाईनवरून त्यांना थेट लाईनवर आणलं आहे.”तुमचा भोंगा हा कायम शिव्या साफ देण्यासाठी वाचतो पण आमचा भोंगा हा शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लोकांसाठी वाजतो, असे ते म्हणाले.
विरोधक द्वेष स्वार्थाची खिचडी शिजवताहेत: लोकसभा निवडणुकीत एनडीएला रोखण्यासाठी बिहारची राजधानी पाटणामध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक झाली होती. यावर देखील मुख्यमंत्र्यांनी हल्ला चढविला. ते म्हणाले, आपण पाटणापासून (शासन आपल्या दारी) सुरुवात केली. त्यानंतर काही लोक पाटणांमध्ये जमा झाले आणि तेथे द्वेषाची, स्वार्थाची खिचडी शिजवू लागले आहेत.
सरकार आणखी मजबूत झाले: सरकार पडणार, मुख्यमंत्री बदलणार अशा खोट्या बातम्या सतत पसरविल्या जात आहे. पण या बातम्या पसरवता-पसरवता आता अजित पवारच सरकारमध्ये आले आणि सरकार आणखी मजबूत झाले. सध्या या लोकांकडून राजकारणात गोंधळ निर्माण करण्याचं काम केलं जात असून आमचं सरकार ‘सर्वसामान्यांचे सरकार’ असल्याचं ते म्हणाले.

